हवामान बदलामुळे भारतात वर्षातील ५० दिवस उष्णतेची लाट वाढणार; वैज्ञानिकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:46 IST2026-01-22T13:31:17+5:302026-01-22T13:46:32+5:30
२०४१ ते २०७० दरम्यान मोठा बदल

हवामान बदलामुळे भारतात वर्षातील ५० दिवस उष्णतेची लाट वाढणार; वैज्ञानिकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतामध्ये हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून, येणाऱ्या काळात उष्णतेचा कहर अधिक वाढणार आहे. एका नवीन वैज्ञानिक अभ्यासानुसार, २०४१ ते २०७० या काळात देशात अतिउष्णतेच्या दिवसांमध्ये ५० दिवसांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर्मनी, पोर्तुगाल, ब्राझील आणि आयआयटी रूरकी येथील तज्ज्ञांनी हा संयुक्त अभ्यास केला असून, वाढती उष्णता व आर्द्रता मानवी शरीरावर गंभीर दबाव निर्माण करू शकते, असा इशारा दिला.
२०४१ ते २०७० दरम्यान मोठा बदल
अभ्यासानुसार, मध्य शतकापर्यंत हवामानात मोठे बदल होतील. २१ व्या शतकाच्या अखेरीस ही स्थिती अधिक भयावह होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसात वर्षातील ७५ पेक्षा जास्त दिवस असे असतील, जेव्हा ‘हीट इंडेक्स’ २७ अंशांच्या वर राहील. थंडीच्या काळात किनारपट्टीच्या भागांत याचा परिणाम अधिक जाणवेल, तर उन्हाळ्यात उत्तर भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
सातत्याने का वाढतेय उष्णता?
हवामान बदलामुळे तापमानात झालेली वाढ आणि विविध भागांमधील आर्द्रतेचे बदलणारे स्वरूप ही यामागची मुख्य कारणे आहेत. तज्ज्ञांच्या मते, या धोक्याशी लढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार रणनीती आखण्याची आता गरज आहे.
