तेलंगणात विजयासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा यज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 06:42 IST2018-11-21T06:42:12+5:302018-11-21T06:42:26+5:30

केसीआर हे पारंपरिक विचारांचे आहेत. राजा श्याम यज्ञ, चंडी यज्ञाबरोबरच त्यांनी जनतेच्या विकासासासाठी प्रार्थना केल्याचे त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात आले.

Chief Minister KCR holds 'yagna' ahead of state polls | तेलंगणात विजयासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा यज्ञ

तेलंगणात विजयासाठी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा यज्ञ

- धनाजी कांबळे

हैदराबाद : निवडणुका जिंकण्यासाठी राज्यकर्ते सर्व मार्गांचा अवलंब करीत असतात. बाबा, संत, महंतांच्या पाया पडणे, धार्मिक स्थळांना भेटी यांपासून पैसे वाटणे, वस्तूंचे वाटप करणे, मोठमोठी आश्वासने देणे हे नित्याचे झाले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते व काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळावा, यासाठी फार्महाऊसवर मोठा यज्ञ केला केला.
केसीआर हे पारंपरिक विचारांचे आहेत. राजा श्याम यज्ञ, चंडी यज्ञाबरोबरच त्यांनी जनतेच्या विकासासासाठी प्रार्थना केल्याचे त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात आले. या
धार्मिक कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले. रविवारी सुरु झालेली पूजा पूणार्हूतीने दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण झाली. अर्थात के. चंद्रशेखर राव यांनी पहिल्यांदाच यज्ञ केलेला नाही. त्यांनी यापूर्वीही यज्ञ केले आहेत व अनेक मंदिरांना भेटी देत सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. सरकारी पैशांतून हा खर्च केल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली आहे.
सुहासिनी विरुद्ध कृष्णा राव
टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांची नात नंदामुरी सुहासिनी यांनी कुकटपल्ली मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे ५ कोटी
८३ लाखांची संपत्ती असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली.
सुहासिनी यांनी कायद्याची
पदवी घेतली असून, माजी खासदार नंदामुरी हरिकृष्णा यांच्या कन्या आहेत. सुहासिनी यांच्याविरोधात तेलंगणा राष्ट्र समितीचे माधवरम कृष्णा राव यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे २ कोटींची संपत्ती आहे. नंदामुरी सुहासिनी आणि माधवरम कृष्णा राव यांच्यातच मुख्य लढत होणार आहे.

केसीआर नवाबासारखे वागतात - खुशबू
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे स्वत:ला नवा नवाब समजतात आणि तसेच लोकांशी वागतात, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या खुशबू यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. चंद्रशेखर राव यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व आश्वासने कचºयाच्या पेटीत पडली असून, त्यांनी केवळ स्वत:च्या कुटुंबाचाच फायदा करून दिला आहे. त्यांना स्वत:ची मुलगी कविता हिला अनेक फायदे मिळवून दिले, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: Chief Minister KCR holds 'yagna' ahead of state polls