लघुशंकेला गेलेल्या पुनमचंद बिष्णोईंमुळे सलमान खान फसला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:03 IST2018-04-05T15:03:09+5:302018-04-05T15:03:09+5:30
मी अन्य काही लोकांसह घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला

लघुशंकेला गेलेल्या पुनमचंद बिष्णोईंमुळे सलमान खान फसला!
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा खटला निकाली निघाला. राजस्थानमधील बिष्णोई समाजाने केलेला पाठपुरावा या खटल्यात महत्त्वाच ठरला. मुळात बिष्णोई समाजाच्याच पुनमचंद बिष्णोईंमुळे हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. पुढील खटल्यातही त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री सलमान खानने काळवीटांना मारले. यावेळी नमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर गेले आणि सलमान काळवीटाची शिकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मी लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो. यादरम्यान मला गोळीबाराचा आवाज आला. मला जीपची हेडलाईट दिसली, यादरम्यान मला गोळीबाराचा आवाज आला, असे त्यांनी सांगितले. यानंतर मी शेजारी राहणाऱ्या छोगारामला उठवले आणि आम्ही जीपच्या मागे गेलो, असे त्यांनी म्हटले होते. त्या जीपमध्ये सलमान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसली होती. बाकीचे कलाकार सलमानला शिकार करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. सलमाननेही लगेचच बंदुकीने गोळी झाडत दोन काळवीटांची शिकार केली, असा दावा बिष्णोईंनी केला होता.
मी अन्य काही लोकांसह घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर बिष्णोई समाजाकडून या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या बिष्णोई समाजातील नागरिकांनी सलमान खान मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.