...अन् काही क्षणांसाठी २११ प्रवाशांनी श्वास रोखला; 'इंडिगो' विमानानं का केलं आपत्कालीन लँडिंग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:34 IST2026-01-29T15:32:34+5:302026-01-29T15:34:15+5:30
पायलटने या विमानाला पक्षी धडकल्यानंतर तातडीने शांत डोक्याने परिस्थिती सांभाळली. त्यामुळे मोठा धोका टळला

...अन् काही क्षणांसाठी २११ प्रवाशांनी श्वास रोखला; 'इंडिगो' विमानानं का केलं आपत्कालीन लँडिंग?
गोव्याहून उत्तर प्रदेशच्या शमशाबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होणाऱ्या इंडिगोच्या एका विमानाला पक्षी धडकला. या विमानात २११ प्रवासी होते. अचानक घडलेल्या या घटनेने सगळेच प्रवासी घाबरले. त्यावेळी प्रसंगावधान राखत पायलटने विमानावर नियंत्रण मिळवले आणि सुरक्षितपणे विमान खाली उतरवले. या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
गोवा एअरपोर्टवरून उड्डाण घेतलेले इंडिगोचे विमान शमशाबाद एअरपोर्ट रनवेवर उतरणार होते. त्याचवेळी एक पक्षी विमानाला धडकला. पायलटने तातडीने एअरपोर्ट ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरला याची सूचना दिली. विमानाचे जेव्हा सुरक्षित लँडिंग झाले तेव्हा एअरसाइड सेफ्टी टीमने रनवेची तपासणी केली. तपासात रनवेवर पक्षाचे अवशेष अथवा कुठलाही हिस्सा सापडला नाही. त्यानंतर एअरपोर्टवर सामान्य उड्डाण संचलन सुरू ठेवण्यात आले.
पायलटनं सांभाळली परिस्थिती
पायलटने या विमानाला पक्षी धडकल्यानंतर तातडीने शांत डोक्याने परिस्थिती सांभाळली. त्यामुळे मोठा धोका टळला. एटीसीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षा टीमसह या विमानाची संपूर्ण तपासणी केली. इंजिन, विंग्स, नोज कोनसह सर्व भाग बारकाईने तपासले. त्यात कुठलेही मोठे नुकसान झाले नसल्याचे आढळले. भारतात अलीकडच्या काळात बर्ड स्ट्राईकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भोपाळ, नागपूर, पटनासारख्या अनेक एअरपोर्टवर या घटना घडल्याची नोंद आहे. ज्यातील काही प्रकरणात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
शमशाबाद एअरपोर्टवर त्याचदिवशी इंजिनमध्ये बिघाड आणि अन्य तांत्रिक समस्यांमुळे आणखी २ घटना समोर आल्या. या घटनांनी सुरक्षेवर आणखी लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हटले जाते. पायलटची कुशलता आणि टीमवर्क यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. इंडिगो एअरलाईन्स आणि एअरपोर्ट प्रशासनने तातडीने कार्यवाही करत सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी केली.