'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:16 IST2021-12-16T15:14:33+5:302021-12-16T15:16:03+5:30
बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे.

'थोडी-थोडी पिया करो...IAS-IPS पण रात्री पितात', नितीश कुमारांच्या बिहारमध्ये मांझींची मुक्ताफळे!
चंपारण-
बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. राज्यातील धनाढ्य आणि प्रशासकीय महत्त्वाचे व्यक्ती जसं की आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर लोक रात्री मद्यपान करतात, असं जीतनराम मांझी यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"राज्यातील धनाढ्य आणि बडे लोक मद्यमान करतात हे तर एक ओपन सीक्रेट आहे. ठेकेदार, धनाढ्य, इंजिनिअर, डॉक्टर, आयपीएस, आयएएस हे सर्वजण रात्री १० नंतर मर्यादित स्वरुपात मद्यपान करतात. पण इतरांना ते मद्यपान करतात याची कोणतीही माहिती नसते", असं वक्तव्य जीतनराम मांझी यांनी केलं आहे.
मद्यपानाबाबत बोलताना गरिबांना सल्ला देण्याचीही मुक्ताफळं मांझी यांनी यावेळी उधळली. "दारु पिऊन कशाला इथंतिथं पडता. जसे बडे लोक मर्यादित स्वरुपात पितात तशी प्या. तुम्हाला पकडून तुमच्यावर कारवाई करण्याची गोष्ट यासाठी होते कारण तुम्ही अमर्याद मद्यपान करुन चौका-चौकात फिरू लागता आणि धिंगाणा घालता. त्यामुळे बड्या लोकांकडून काहीतरी शिका. रात्री प्यायची असेल तर प्या आणि शांत झोपून जा. सकाळी उठून कामाला लागा", असंही जीतनराम मांझी म्हणाले.
दरम्यान, बिहारमध्ये सध्या दारुबंदीच्या मुद्द्यावरुन मोठं राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याआधीच राज्य सरकार कोणत्याही पद्धतीनं दारुबंदीच्या नियमात बदल करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याउलट दारुबंदी कायद्यात आणखी कठोर पावलं उचलण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नितीश कुमार यांच्या याच वक्तव्यानंतर आता माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचं हे नवं विधान समोर आलं आहे.
जीतनराम मांझीच नव्हे, तर बिहारमधील मद्यविक्री आणि मद्यपानाची आकडेवारीच पोलखोल करणारी आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत राज्यात ३ लाख २५ हजार ८७८ लीटर दारु जप्त झाली आहे. याशिवाय ११ हजारहून अधिक जणांना अटक झाली आहे. त्यामुळे राज्यात दारुबंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध कशी होते असा सवाल उपस्थित केला जात आहे.