'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 14:37 IST2025-06-01T14:35:46+5:302025-06-01T14:37:27+5:30
Chirag Paswan News: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
Chirag Paswan in Bihar Assembly Election: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्षाचे प्रमुख चिराग पासवानबिहार विधानसभा निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. चिराग पासवान यावेळी निवडणूक लढवतील की नाही, यावर राज्यात चर्चा तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत चिराग पासवान यांनी ही निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षाचे नेते घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अलीकडेच पाटणा येथे झालेल्या लोजपाच्या कार्यकारिणी बैठकीत चिराग पासवान 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' बोलले. या घोषणेशी राज्यातील जनता जोडलेली आहे. लोजपा कडून एक सर्वेक्षण देखील करण्यात आले, ज्यात चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी अनेकांची मागणी आहे.
बिहारच्या लोकांचा चिराग यांच्यावर विश्वास
या सर्वेक्षणात असे आढळून आले की, बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की, चिराग पासवान यांनी बिहारमध्ये येऊन बिहारींसाठी काम करावे. मात्र, अंतिम निर्णय चिराग पासवान यांनाच घ्यायचा आहे.
कोणत्या जागेवरून निवडणूक लढवू शकतात?
सूत्रांच्या माहितीनुसार, चिराग पासवान बिहार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात, तर त्यांच्यासाठी काही जागाही निश्चित झाल्या आहेत. चिराह पटना, दानापूर किंवा हाजीपूर यापैकी कोणत्याही एका जागेवरून निवडणूक लढवू शकतात असे मानले जाते.
चिराग यांची लोकसभेत चांगली कामगिरी
चिराग पासवान हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. चिराग यांच्या लोजपाने पाच जागांवर लोकसभा निवडणूक लढवली आणि सर्व जागा 100 टक्के स्ट्राइक रेटने जिंकल्या. चिराग स्वतः हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आणि त्यांना केंद्रात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी आता फारसा वेळ शिल्लक नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्या पक्षाला चिराग यांची राज्यात रास्त गरज आहे.