मोठी बातमी: राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 13:50 IST2022-11-11T13:50:26+5:302022-11-11T13:50:47+5:30
Rajiv Gandhi Assassination Case: भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

मोठी बातमी: राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली - भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.
२१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेराम्बदूर येथे एका प्रचारसभेदरम्यान आत्मघाती हल्ला करून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पेरारिवलन याच्यासह ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. टाडा कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने पेरारिवलन याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर कोर्टाने दया याचिकेवरील निर्णयाला उशीर झाल्याचा आधार घेत पेरारिवलनला सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली होती.
आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस हे मुक्त होणार आहेत. तर पेरारिवलन हा आधीच या प्रकरणातून मुक्त झाला आहे. सुप्रीम कोर्टाने तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे १८ मे रोजी पेरारिवलन याला मुक्त करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती एल. नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम १४२चा वापर करून हा आदेश दिला होता.