स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:33 IST2025-06-04T19:32:52+5:302025-06-04T19:33:04+5:30
आरबीसीनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत जल्लोषाचं वातावरण होते. हजारो चाहते सकाळपासून चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते.

स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
बंगळुरू - आयपीएल २०२५ चा खिताब जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) टीम बुधवारी कर्नाटकातील बंगळुरूत पोहचली. याठिकाणी एअरपोर्टबाहेर हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर विजयी टीम मुख्यमंत्री सिद्धरम्मैया यांच्या भेटीला विधानसभेत पोहचली. त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा होता. त्याआधी विजयी परेड निघाली परंतु त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जखमी झालेत. या सोहळ्यावरून कर्नाटकात राजकारण चांगलेच पेटले असून विरोधी भाजपाने सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
या घटनेनंतर उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनी म्हटलं की, मी आत्ताच पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी बोललो. सध्या या घटनेतील मृतांचा आकडा समोर आला नाही. आम्ही लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. या घटनेनंतर खेळाडूचा सत्कार सोहळाही १० मिनिटांत संपवण्यात आला. आम्ही परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला आरसीबी आणि कर्नाटकावर गर्व आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा विजय मिळाला परंतु मी बंगळुरू आणि कर्नाटकातील लोकांची माफी मागतो. आम्ही ही विजयी मिरवणूक काढली त्यात गर्दी नियंत्रणाबाहेर गेली असं त्यांनी सांगितले. तर ही जी घटना घडली त्याला सरकार जबाबदार आहे. लोक किती जमणार, काय काळजी घ्यायला हवी हे माहिती नाही. राज्य सरकारच्या अपयशामुळे आज लोक मृत्युमुखी पडले असं भाजपा आमदार नारायणस्वामी यांनी म्हटलं.
VIDEO | Bengaluru: Karnataka Deputy CM DK Shivakumar (@DKShivakumar) says, "We are very proud of RCB and Karnataka. 18 years, a long struggle. Kohli's loyalty has paid royalty... I think this is not a controllable crowd. I apologise to all the people of Bengaluru and Karnataka,… pic.twitter.com/eCw6KgtZIa
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
जल्लोषात पसरला शोक
आरबीसीनं पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूत जल्लोषाचं वातावरण होते. हजारो चाहते सकाळपासून चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. परंतु जसंजसं वेळ होत गेला तसे इथली गर्दी जास्त वाढली. त्यानंतर लोकांनी दिसेल तिथून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लोक झाडे, भिंती ओलांडून स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या गर्दीचे नियोजन करण्यात राज्य सरकारला अपयश आले. त्यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. त्यात अनेक जण चेंगराचेंगरीत दगावले आणि जखमी झाले.
#WATCH | Karnataka police use mild force to manage the crowd outside M Chinnaswamy Stadium in Bengaluru
— ANI (@ANI) June 4, 2025
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have arrived here to catch a glimpse of their champion team. pic.twitter.com/rnBSTx8vEN
दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ३० ते ३२ हजार इतकी आहे. पण स्टेडियमबाहेर लाखोंची गर्दी झाली. यावेळी गर्दीला आवरणं सुरक्षारक्षकांनाही कठीण होऊन बसलं. गर्दी इतकी होती चक्क स्टेडियमबाहेरील वाहनांवर लोक चढले. वाहनांचंही मोठं नुकसान झालं आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला स्टेडियममध्ये सुरू असलेला विजयी समारंभ ३० मिनिटांत संपवण्याचे आदेश दिले मात्र घडलेल्या प्रकारामुळे आरसीबीच्या विजयी जल्लोषात दु:खाचं विरजन पडले.