Bihar Election Arvind Kejriwal: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवालाच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने रणशिंग फुंकले आहे. बिहारमध्ये आप इंडिया आघाडीसोबत न जाता स्वबळाचा नारा दिला आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली. केजरीवालांनी एकला चलो अशी भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिहार विधानसभा निवडणुकीबद्दलची आम आदमी पक्षाची भूमिका अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली. केजरीवालांची अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर हल्ला चढवला.
अरविंद केजरीवाल म्हणाले, 'काँग्रेससोबत आमची कोणतीही आघाडी असणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर मैदानात उतरेल.'
वाचा >>लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल
'बिहारमध्ये आम आदमी पक्ष निवडणूक लढवले. इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती. आता आमची कोणतीही आघाडी नाही. विधानसभा पोटनिवडणूक आम्ही काँग्रेससोबत न जाता लढवली आणि काँग्रेसपेक्षा तीन पट अधिक मते मिळवून विजयी झालो. आता आम आदमी पक्ष हाच पर्याय असल्याचा मेसेज जनतेने दिला आहे', असे केजरीवाल म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत बसला होता फटका
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांची आप आणि काँग्रेस स्वतंत्र लढले होते. याचा थेट फटका आपला बसल्याचे निकालाच्या आकडेवारीतून दिसून आले. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत केजरीवाल इंडिया आघाडीत येणार का, याकडे लक्ष होते.
बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी यांच्याबरोबर प्रशांत किशोर यांच्या पक्षाचाही प्रवेश झाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या मतांच्या विभाजनाचाच धोका असणार आहे.