#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:39 AM2018-10-20T09:39:00+5:302018-10-20T09:45:48+5:30

Amritsar Rail Accident: आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता. 

Amritsar train accident : Railways says no one told us about the event | #AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

#AmritsarTrainAccident : ... तर दुर्घटना टळली असती; रेल्वे प्रशासनाने केले हात वर!

Next

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या दुघटनेबाबात रेल्वे प्रशासनाकडून हात झटकण्यात आले आहेत. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचून या दुर्घटनेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर मनोज सिन्हा यांनी सांगितले की, उत्तर रेल्वेच्या फिरोझपूर विभागामध्ये हा भीषण अपघात घडला. आयोजित कार्यक्रमाबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आधीच सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता. 


रावणदहन पाहाण्यासाठी हजारो लोक याठिकाणी जमले होते. रावणदहनावेळी फटाके फुटू लागल्याने त्यापासून लोक दूर जाऊ लागले. त्यातील 300 हून अधिक जण बंद असलेल्या फाटकाजवळील रेल्वे रुळांत जाऊन उभे राहिले. ते सारे जण हा सोहळा पाहाण्यात व त्याचे मोबाइलवर चित्रीकरण करण्यात इतके मश्गुल होते की, फटाक्यांच्या धूमधडाक्यात समोरून ट्रेन येत असल्याचे भानही त्यांना राहिले नाही. एकाच वेळी जालंधरहून अमृतसरकडे एक ट्रेन येत होती तर तेथूनच हावडा मेल जात होती. काही कळायच्या आतच ट्रेन अनेकांना चिरडून पुढे निघून गेली. ज्यांनी एका ट्रेनपासून वाचण्याचा प्रयत्न केला, ते दुस-या ट्रेनखाली आले. थरकाप उडविणा-या या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यास तिथे हजर असलेल्यांपैकीच अनेक जण पुढे सरसावले. जखमींना जवळच्याच इस्पितळात दाखल करण्यात आले.



 

जीव वाचविण्याची संधी मिळाली नाही
जालंधरहून अमृतसरकडे ट्रेन येत असतानाच विरुद्ध दिशेनेही दुसरी ट्रेन आली. त्यामुळे रुळांवर उभे असलेल्या बेसावध लोकांना आपला जीव वाचविण्याकरिता धावपळ करायची उसंतही मिळाली नाही.


मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अरमिंदर सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर जखमींवर मोफत उपचार केले जातील. या अपघाताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री सिंग यांनी दिले आहेत.

Web Title: Amritsar train accident : Railways says no one told us about the event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.