अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:28 IST2025-08-04T19:27:14+5:302025-08-04T19:28:06+5:30
Amit Shah meeting with PM Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीबद्दल दिल्लीत वेगळी चर्चा सुरू आहे.

अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
Amit Shah Latest News: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी ५ ऑगस्ट २०२५ हा दिवस खास असणार आहे. कारण भाजपचेच नेते लालकृष्ण आडवाणी यांचा रेकॉर्ड अमित शाह मोडणार आहेत. देशाच्या गृहमंत्रिपदी सर्वाधिक काळ राहणारे ते पहिले व्यक्ती बनणार आहेत.
सर्वाधिक काळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून राहण्याच्या त्यांच्या या गोष्टीबरोबरच दिल्ली आणखी एका विषयाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू झाली ती अमित शाह यांनी आधी पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीमुळे. केंद्र सरकार जम्मू काश्मीरबद्दल आणखी एक निर्णय घेण्याची अंदाज दिल्लीतील राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहेत.
लालकृष्ण आडवाणी किती वर्षे होते गृहमंत्री?
सर्वाधिक काळ देशाच्या गृहमंत्री म्हणून राहण्याचा विक्रम लालकृष्ण आडवाणी यांच्या नावे आहे. लालकृष्ण आडवाणी ६ वर्ष ६४ दिवस देशाचे गृहमंत्री होते. त्यानंतर अमित शाह यांचे नाव सर्वात वरती असणार आहे. ५ ऑगस्ट रोजी अमित शाह आडवाणींच्या नावे असणारा विक्रम मोडतील.
गृहमंत्रीपदावर सर्वात कमी राहिलेल्या व्यक्ती इंदिरा गांधी आहेत. १९६६ मध्ये इंदिरा गांधींनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. ९ नोव्हेंबर १९६६ ते १३ नोव्हेंबर १९६६ या दरम्यान त्या गृहमंत्री होत्या. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी गृहमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली होती.
जम्मू काश्मीरबद्दल सरकार निर्णय घेणार?
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० हटवले. त्याचबरोबर या प्रदेशाची तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभागणी केली. जम्मू, काश्मीर आणि लडाख. इथे निवडणूक झाली असून, आता राज्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, रविवारी म्हणजे ३ ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आधी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटले. ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द करण्याला सहा वर्ष पूर्ण होत आहेत.
सरकार केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण अमित शाह यांनी एकाच दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
शाह यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींची भेट घेऊन काय माहिती दिली? सरकार संसदेमध्ये कुठले विधेयक आणण्याच्या तयारीत आहे का? हे विधेयक जम्मू काश्मीरशी संबंधित आहे का? अशा चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहेत.