जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 07:01 IST2025-06-14T07:00:44+5:302025-06-14T07:01:43+5:30

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये विमानातील २४१ जणांसह २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून, त्यांच्या आक्रोश हेलावून टाकत आहे. 

Air India Plane Crash: Close people gone, all dreams shattered, the cries of those who lost relatives in a plane crash | जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश

जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश

अहमदाबादमध्येएअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातामध्ये विमानातील २४१ जणांसह हे विमान ज्या इमारतींवर कोसळले तेथील काही जण असे मिळून २६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून, त्यांच्या आक्रोश हेलावून टाकत आहे. 

माझी आई आणि मुलीला कुणी शोधता का हो..? रवी ठाकोर यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा


अहमदाबादेतील विमान अपघाताला २४ तास उलटले तरी माझी आई आणि मुलीचा शोध लागलेला नाही. त्यांना कुणी शोधता का हो..? असा आक्रोश बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल खानावळीत काम करणारे रवी ठाकोर करत असून, यामुळे ऐकणाऱ्यांचे हृदय पिळवटून निघत आहे.

ठाकोर यांनी सांगितले की, ते, त्यांची आई व पत्नी खाणावळीत काम करतात. ज्युनिअर डॉक्टर तेथे जेवणासाठी येतात, तर वरिष्ठ डॉक्टरांना जेवण रुग्णालयात नेऊन द्यावे लागते. त्यानुसार मी जेवण घेऊन रुग्णालयात गेलो होतो. खाणावळीत माझी आई व मुलगी होती. 

दुर्घटनेच्या वेळी माझी आई सरला आणि मुलगी आद्या खाणावळीत होत्या. विमान त्या इमारतीवर कोसळले. आता अपघाताला २४ तास उलटले तरी त्यांचा शोध लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या याद्या तपासल्या आहेत. रात्रभर नागरी व खासगी रुग्णालयांत त्यांचा शोध घेतला. परंतु काहीही कळाले नाही. सर्व बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध लागला व मृतदेहांची ओळख पटली आहे. परंतु माझी आई व मुलगी सापडत नाही. खाणावळीतील सुरक्षारक्षक आम्हाला आत जाऊ देत नाहीत. मला वाटते की, माझी आई आणि मुलगी तळमजल्यावर गेल्या असाव्यात. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार विद्यार्थी व एका डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. 

मी दोन कोटी रुपये देते वडिलांना परत आणा


मला एक कोटी रुपये देण्याची तुमची इच्छा आहे. मीच तुम्हाला दोन कोटी रुपये देते, माझ्या वडिलांना परत आणा, असे भावुक उद्गार विमान अपघातात वडिलांना गमवलेल्या फाल्गुनी नावाच्या मुलीने काढले आहेत.     माझ्या वडिलांची काय चूक होती, कोणी मला सांगेल काय. ते या फ्लाइटमध्ये बसले ही त्यांची चूक होती का, असा सवाल करत फाल्गुनी यांनी संबंधित एअरलाइनबद्दल नाराजी व्यक्त केली.
पैशाने माणूस खरेदी करता येतो का, आम्ही त्या पैशातून पलंग खरेदी करू. मात्र, त्यावर झोप येईल का, माझे वडील माझ्यावर खरे प्रेम करत होते. ते मला कसे मिळेल, असे प्रश्न उपस्थित करत फाल्गुनी यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. माझे वडील एक देशभक्त होते. ते स्वत:ला एअर इंडियाचा गौरवशाली प्रवासी मानत. एअर इंडिया आपला गर्व आहे. ती देशाची शान आहे, असे ते नेहमी म्हणत. त्यांच्या देशभक्तीचे हे बक्षीस आहे, असे फाल्गुनी म्हणाल्या.

सर्व काही संपले, आता ती कधीच परतणार नाही


सर्व काही संपले आहे. आता ती कधीच परत येणार नाही, अशा भावना अहमदाबाद येथील विमान अपघातात ठार झालेली एअर होस्टेस नगनथोई शर्मा हिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. नगनथोई ही मणिपूरच्या थौबल शहरातील रहिवासी होती.  
नगनथोई हिने गुरुवारी सकाळी  ११ वाजेच्या सुमारास आपली मोठी बहीण गीतांजलीसोबत फोनवर संपर्क केला होता. लंडनला जाणार असल्याने काही दिवस फोनवर बोलता येणार नाही. १५ जून रोजी परत आल्यानंतर फोन करणार असल्याचे तिने बहिणीला सांगितले. तो तिचा शेवटचा कॉल ठरल्याची माहिती गननथोईचे पिता नंदेश कुमार शर्मा यांनी दिली. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास विमान अपघात झाल्याची बातमी गीतांजलीला मोबाइलद्वारे समजली. त्यानंतर लगचे कुटुंबीयांनी
गननथोईला कॉल केला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याची प्रतिक्रिया नगथोईचे मोठे काका सनतोम्बा यांनी सांगितले.

लग्नानंतर प्रथमच पतीकडे लंडनला निघाली पण... 


अनेक स्वप्ने उराशी बाळगून राजस्थानच्या बालोतराची खुशबू लग्नानंतर प्रथमच लंडनला डॉक्टर पतीकडे निघाली होती. घरच्यांनी तिला विमानात बसताना भरल्या डोळ्यांनी निरोप दिला... आणि हा अखेरचा निरोप ठरला. कारण, विमान कोसळल्याने काही मिनिटांत खुशबूने या जगाचा निरोप घेतला.वडिलांनी विमानतळाबाहेर मुलीसोबत फोटोही काढला, परंतु हा अखेरचा फोटो ठरला. 

विजय रुपानींचा लकी नंबर १२०६ ठरला मृत्यूचा दिवस


गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा गुरुवारी अहमदाबाद येथील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रुपानी हे १२०६ हा अंक स्वत:साठी भाग्यवान संख्या मानत होते. या आकड्यासोबत भावनिक नाते असल्यामुळे रुपानी यांच्याकडील सर्व वाहने १२०६ या क्रमांकाची होती. गुरुवारी अहमदाबादेत विमान अपघात झाला ती तारीख १२ जून म्हणजे १२०६ होती. त्यामुळे रुपांनी यांचा सर्वांत आवडता लकी नंबर दुर्दैवाने त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे.  रुपानी यांच्या स्कूटरपासून कारपर्यंतच्या सर्व वाहनांचा १२०६ हा नंबर होता, असे स्थानिकांनी सांगितले.

पत्नीचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा करायचा होता, पण...
अपघातात आग्रा येथील नीरज लवानिया (५१) आणि पत्नी अपर्णा (५०) यांचा मृत्यू झाला. पत्नीचा पन्नासावा वाढदिवस लंडनमध्ये धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी हे दात्पत्य दिल्लीहून निघाले. परंतु, अहमदाबादेतच त्यांचा हा प्रवास थांबला. नीरज यांच्या सासरचे कुटुंबीय लंडन येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे पत्नी अपर्णाचा वाढदिवस तेथेच साजरा करण्यासाठी दोघे निघाले होते. बडोद्यात एका खासगी कंपनीत नीरज कार्यरत होते. बऱ्याच वर्षांपासून ते या शहरात राहत होते. प्रशासनाने अपघातानंतर नीरज यांच्या कुटुंबीयांना कळवले. त्यांच्या मुलीशीही संपर्क साधला. नीरज व अपर्णा या दोघांचाही मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले.

 

Web Title: Air India Plane Crash: Close people gone, all dreams shattered, the cries of those who lost relatives in a plane crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.