"एक बार कमिटमेंट कर लिया तो..."; एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचा पाकिस्तानला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:33 IST2025-05-29T15:32:34+5:302025-05-29T15:33:21+5:30
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आभारी आहोत. या विजयात प्रत्येक भारतीयाचे योगदान आहे. या ऑपरेशनला खूप प्रोफेशनली करण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं.

"एक बार कमिटमेंट कर लिया तो..."; एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. यात पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला. आम्ही प्रत्येक दिवशी नव्या तंत्रज्ञानाचा विकास करत आहोत. आता युद्धावेळी तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका राहील. आपल्याला भविष्यात काय करायचंय त्याबाबत ऑपरेशन सिंदूरने आयडिया दिली आहे. अजून खूप काम बाकी आहे असं सांगत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
वार्षिक बिझनेस समिट २०२५ च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर चीफ मार्शलने ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. "प्राण जाए पर वचन ना जाए..." असं सांगत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी अभिनेता सलमान खानच्या सिनेमातील फेमस डायलॉग म्हटला. एक बार जब मै खुद से कोई कमिटमेंट कर लेता हूँ, तो खुद की भी नही सुनता...या शब्दात एअर चीफ मार्शल यांनी पाकिस्तानला इशारा दिला. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा विजय झाला. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आभारी आहोत. या विजयात प्रत्येक भारतीयाचे योगदान आहे. या ऑपरेशनला खूप प्रोफेशनली करण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय युद्धाची रणनीती बदलत आहे. नवीन तंत्रज्ञान येत आहे. युद्धात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे. आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे. जे आधीपासून सुरू आहे. मला विश्वास वाटतो, जसं आपण आताच्या आव्हानाला सामोरे गेलो तसे भविष्यात आपण एक राष्ट्र म्हणून आपले ध्येय गाठण्यासाठी सक्षम होऊ. जेव्हा आपण एक राष्ट्र म्हणतो, तेव्हा त्यात लष्कर, नौदल, वायूसेना, विविध यंत्रणा, उद्योग, डिआरडिओ या मोठ्या साखळ्या आहेत. त्यामुळे आपण सगळे सक्षम आहोत असं एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी सांगितले.
भारताविरोधात दहशतवादाचं षडयंत्र, पाकला पडणार भारी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली. त्यात भारताने ६-७ मेच्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेजवळील शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय सैन्याने हे सगळे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानकडून हल्ल्यात ड्रोन, मिसाईलचा वापर केला गेला मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले.