इंटरनेटइतकेच स्वस्त करणार एआय; मुकेश अंबानींची १० लाख कोटींची महागुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 11:51 IST2026-02-20T11:51:11+5:302026-02-20T11:51:45+5:30
शेतकरी ते दुकानदार... प्रत्येकाच्या मदतीला आता एआय येणार; पिकांवरील रोग ओळखणार अन् सल्लाही देणार; भारताला प्रगती करायची असेल, तर बुद्धिमत्ता भाड्याने घेऊ नये

इंटरनेटइतकेच स्वस्त करणार एआय; मुकेश अंबानींची १० लाख कोटींची महागुंतवणूक
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने स्वस्त मोबाइल अन् इंटरनेट देऊन देशात डिजिटल क्रांती घडवून आणली, अगदी त्याच धर्तीवर आता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध करून देण्याची घोषणा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केली आहे. ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये बोलताना त्यांनी पुढील ७ वर्षांत १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा मेगाप्लॅन जाहीर केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
जगभरात एआय काही मोजक्या देशांच्या हातात केंद्रीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र भारताचा मार्ग वेगळा आहे. एआय सर्वांसाठी उपलब्ध, परवडणारी आणि उपयुक्त केली तरच खरी प्रगती होईल. हीच भारताची दिशा आहे, असे अंबानी म्हणाले. यावेळी त्यांनी जिओच्या माध्यमातून एआयचा विस्तार करणार असल्याचे सांगितले.
प्रत्येकाला एआयचा फायदा होणार : अंबानी
मुकेश अंबानी म्हणाले की, भारताला प्रगती करायची असेल, तर आपण बुद्धिमत्ता भाड्याने घेऊ शकत नाही.
ज्याप्रमाणे आम्ही इंटरनेटचे दर कमी करून ते प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचवले, तसेच आता एआयदेखील स्वस्त करू. यामुळे किरणा दुकानदारापासून ते शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला या तंत्रज्ञानाचा फायदा होईल.
जिओ शिक्षक : २२ भाषांमध्ये शिक्षण देणारे तंत्रज्ञान जिओ आणेल, जे मुलांच्या गरजेनुसार शिकवेल.
जिओ आरोग्य एआय : आजारांचे त्वरित निदान आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी मदत जिओ आरोग्य एआय मदत करेल.
जिओ कृषी : १४ कोटी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पिकांवरील रोगांची माहिती देण्यासाठी खास तंत्रज्ञान.
जिओ भारत आयक्यू : केवळ आवाजावर चालणारे ‘असिस्टंट’, जे सरकारी योजना आणि रोजगाराची माहिती देईल.
समिट’मध्ये भाषण करणार असलेले जगप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी आपले एआय समिटमधील मुख्य भाषण रद्द केल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. तथाकथित ‘एप्स्टीन फाईल्स’ वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ‘गेट्स फाउंडेशन’ने ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. एआय शिखर परिषदेतील मुख्य उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित राहावे, यासाठी सखोल विचारांती गेट्स भाषण देणार नाहीत, असे फाउंडेशनने स्पष्ट केले.
अधिक डिजिटल व्यवहार आणि मजबूत स्टार्टअप व्यवस्था भारताकडे आहे. त्यामुळे भारताकडे जगातील सर्वात मोठा डेटा वापरकर्ता आहे.
२१ व्या शतकात भारत एआय महासत्ता बनेल. लोकसंख्या, लोकशाही, विकास आणि डिजिटल पायाभूत सुविधा या सर्व बाबतीत भारताची ताकद जगात कुणीही मोजू शकत नाही, असे अंबानी म्हणाले.
या प्रकल्पासाठी गुजरातच्या जामनगरमध्ये अवाढव्य ‘डेटा सेंटर्स’ उभारले जाणार आहेत. हे केंद्र चालवण्यासाठी १० गिगावॅट इतकी प्रचंड ‘हरित ऊर्जा’ (सौर आणि पवन ऊर्जा) वापरली जाईल, ज्यामुळे हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक असेल.