एआय महाकुंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; जगभरातील दिग्गज सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 05:48 IST2026-02-17T05:47:57+5:302026-02-17T05:48:56+5:30
या परिषदेत जगभरातील दिग्गज तंत्रज्ञ, मोठे उद्योजक आणि ३ हजारपेक्षा जास्त वक्ते सहभागी होत आहेत. भारताच्या ताकदीचे दर्शन या निमित्ताने अवघ्या जगाला घडणार आहे.

एआय महाकुंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; जगभरातील दिग्गज सहभागी होणार
नवी दिल्ली : शेती असो वा सरकारी कचेरी, आता सगळीकडे ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा डंका वाजत आहे. जगातील सर्वांत मोठ्या ‘एआय समिट’ला सोमवारपासून दिल्लीतील भारत मंडपम येथे दिमाखात सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले.
या परिषदेत जगभरातील दिग्गज तंत्रज्ञ, मोठे उद्योजक आणि ३ हजारपेक्षा जास्त वक्ते सहभागी होत आहेत. भारताच्या ताकदीचे दर्शन या निमित्ताने अवघ्या जगाला घडणार आहे. या प्रदर्शनात देश-विदेशातील ६००हून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाले असून १३ देशांनी स्वतंत्र पॅव्हिलियन उभारून एआय क्षेत्रातील ताकद दाखवली आहे.
पंतप्रधानांनी विविध स्टॉल्सना भेट देत तरुण उद्योजकांशी संवाद साधला. नव्या तंत्रज्ञानातून शेती, आरोग्य, शिक्षण व उद्योग क्षेत्रात कसा बदल घडवता येईल, याबाबत त्यांनी माहिती घेतली.
नोकरी वाचवायची, तर एआय शिका
सध्या सगळीकडे ‘एआय’मुळे नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, यात घाबरून न जाता शांत राहा, नोकरी वाचविण्यासाठी एआयची नवी साधने शिका आणि स्वतःला सतत अपडेट ठेवा, असा स्पष्ट संदेश तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’च्या पार्श्वभूमीवर जिओ एआय पॅव्हेलियनमध्ये जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य, शिक्षण, संस्कृती तसेच स्मार्ट होम क्षेत्रातील एआय-आधारित परिवर्तनाबद्दल माहिती दिली.
१३ देशांचा सहभाग
एआय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे दर्शन घडवणारे १३ देशांचे मंडप परिषदेत आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, ताजिकिस्तान आणि आफ्रिकेतील प्रतिनिधींचा सहभाग आहे.
रोजगार निर्मिती, कौशल्य विकासावर भर
या एक्स्पोमध्ये आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्या, भारतीय स्टार्टअप्स, विद्यापीठे, संशोधन संस्था, केंद्र व राज्य सरकारांचे विभाग तसेच विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. एआयच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञान पोहोचविणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.