Ahmedabad Serial Bomb Blast: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय, 49 दोषी तर 28 जणांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 13:05 IST2022-02-08T13:05:35+5:302022-02-08T13:05:54+5:30
Ahmedabad Bomb Blast Case: 26 जुलै 2008 ला अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी साखीळ बॉम्बस्फोट झाले होते. त्या घटनेत 56 जणांचा मृत्यू आणि 246 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

Ahmedabad Serial Bomb Blast: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय, 49 दोषी तर 28 जणांची सुटका
अहमदाबाद:अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Serial Bomb Blast) प्रकरणी गुजरातच्या विशेष न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाने 77 पैकी 49 जणांना दोषी ठरवले आहे, तर 28 जणांची निर्दोष सुटका केली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी निकाल दिला.
अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी झालेल्या 21 बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये 28 आरोपी 7 राज्यांच्या तुरुंगात कैद आहेत. या प्रकरणी 9000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले, ज्यात 6000 कागदोपत्री पुरावे ठेवण्यात आले होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत गुजरातमध्ये 9 न्यायाधीश बदलले. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले.
काय घडलं त्या दिवशी ?
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 20 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. ज्यामध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 246 जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी अहमदाबादमध्ये 19 आणि कलोलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींविरोधात गुन्हेगारी कट रचणे, देशद्रोह आणि सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्याचे पुरावे आहेत. राज्यातील शांतता बिघडवणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणे यासाठीही आरोपींविरुद्ध पुरावे मिळाले आहेत.