९० डिग्रीच्या पुलांनंतर आता भोपाळमध्ये रस्त्याच्या मधोमध उभारला 'आयफेल टॉवर'; मृत्यूच्या छायेत नागरिकांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:44 IST2026-02-10T16:43:26+5:302026-02-10T16:44:38+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सनी बांधलेल्या ९० डिग्रीच्या वळणदार पुलाचा वाद शमतो न शमतो, तोच आता वीज विभागाच्या इंजिनिअर्सनी आपला जलवा दाखवला आहे.

९० डिग्रीच्या पुलांनंतर आता भोपाळमध्ये रस्त्याच्या मधोमध उभारला 'आयफेल टॉवर'; मृत्यूच्या छायेत नागरिकांचा प्रवास
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ सध्या आपल्या अजब-गजब इंजिनिअरिंगमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सनी बांधलेल्या ९० डिग्रीच्या वळणदार पुलाचा वाद शमतो न शमतो, तोच आता वीज विभागाच्या इंजिनिअर्सनी आपला जलवा दाखवला आहे. भोपाळच्या करोंद परिसरात चक्क रहदारीच्या रस्त्याच्या मधोमध हाय व्होल्टेज विद्युत टॉवर उभा करण्यात आला असून, स्थानिक नागरिक याला प्रशासनाचा नवा अजूबा आणि मृत्यूचा सापळा म्हणत आहेत.
रस्त्यावर टॉवर की मृत्यूचा सापळा?
भोपाळच्या करोंद भागातील विनायक कॉलनीत हा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मधोमध उभा असलेला हा हाय व्होल्टेज टॉवर केवळ वाहतुकीसाठी अडथळा ठरत नाहीये, तर नागरिकांच्या जिवावरही उठला आहे. टॉवरची उंची कमी असल्याने मोठ्या वाहनांना इथून जाणे अशक्य होते. सर्वात भयानक बाब म्हणजे, पावसाळ्यात या टॉवरखालील रस्त्यावरून चालताना करंट लागण्याची भीती असते. रहिवाशांच्या दाव्यानुसार, दरवर्षी इथे एक-दोन जणांचा करंट लागून मृत्यू होतो, पण तरीही प्रशासन ढिम्म आहे.
२० वर्षांपासून समस्या जशीच्या तशी
"गेल्या २० वर्षांपासून आम्ही या नरकयातना सोसत आहोत," अशा शब्दांत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला. दोन दशके उलटूनही ना हा टॉवर हटवण्यात आला, ना इथे नीट रस्ता तयार करण्यात आला. अनेकदा तक्रारी करूनही वीज विभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
९० डिग्रीच्या पुलाची झाली होती जगभरात चर्चा
याआधी भोपाळच्या ऐशबाग परिसरात बांधलेला १८ कोटींचा रेल्वे ओव्हरब्रिज आपल्या विचित्र डिझाइनमुळे चर्चेत आला होता. या पुलाला चक्क ९० डिग्रीचा धोकादायक वळण देण्यात आले होते. २०२५ मध्ये बांधलेल्या या पुलामुळे अपघातांची मालिका सुरू झाली होती, ज्यानंतर संबंधित इंजिनिअर्सवर कारवाई देखील करण्यात आली होती. आता या पुलाच्या वारसा हा रस्त्यातला टॉवर पुढे चालवत असल्याची टीका होत आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. "हा विषय आताच आमच्या समोर आला असून विभाग याची चौकशी करेल आणि योग्य तो मार्ग काढला जाईल," असे आश्वासन भाजप प्रवक्ते अजय सिंह यादव यांनी दिले आहे. तर दुसरीकडे, "मध्य प्रदेश सरकार इंजिनिअरिंगमध्ये रोज नवनवे कीर्तिमान प्रस्थापित करत आहे. आधी ९० डिग्रीचा पूल आणि आता रस्त्यात टॉवर, हे सरकार नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे," अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते शहरयार खान यांनी केली आहे.