प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:42 IST2025-08-04T12:22:02+5:302025-08-04T12:42:42+5:30
ओडिशातील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

प्राध्यापकाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून एबीव्हीपी नेत्यासह दोघांना अटक
Balasore College Harassment Case: ओडिशातील पुरी जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. दोन आठवडे जीवन आणि मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मुलीचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बालासोरमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात ओडिशा पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य सहसचिवासह दोघांना अटक केली. एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्धच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर संस्थेने निष्क्रियता दाखविल्यामुळे २० वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती.
जुलैच्या सुरुवातीला फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमधल्या प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर दुसऱ्या वर्षाच्या बी एडच्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यावेळी एबीव्हीपी नेते सुभट संदीप नायक आणि ज्योती प्रकाश बिस्वाल तिथे उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले. ९० टक्के भाजलेल्या या विद्यार्थिनीचा घटनेच्या दोन दिवसांनी १५ जुलै रोजी मृत्यू झाला होता, ज्यामुळे ओडिशामध्ये संतापाची लाट उसळली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागप्रमुख समीर रंजन साहू यांच्याविरुद्ध वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्राचार्य दिलीप घोष यांच्यासह महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. साहू सतत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच समीर साहू नापास करण्याची धमकी देऊन मानसिक छळ करायचा असा आरोप विद्यार्थिनीचा होता. पीडितेने तिच्या सहकाऱ्यांना विभागप्रमुखांविरुद्ध गंभीर कारवाईची मागणी करण्यासाठी एकत्र केले होते. मात्र कारवाई न झाल्याने तिने टोकाचं पाऊलउचललं
विद्यार्थिनीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. तिला वाचवण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली मात्र तोपर्यंत तिच्या शरीराचा ९०% पेक्षा जास्त भाग भाजला होता. तिला सुरुवातीला बालासोर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला एम्स भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलिसांच्या तपासात, महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल न झाल्यामुळे, प्राचार्यांसोबत झालेल्या भेटीनंतर लगेचच महिलेने आत्महत्या केली. या भेटी दरम्यान तिला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला असाही आरोप करण्यात आला. जर आरोप मागे घेतले नाहीत तर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल असे मुख्याध्यापकांनी तिला सांगितले होते, असं कुटुंबियांनी म्हटलं. विभागप्रमुख साहू यांनी प्रशासनावर तिच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यासाठी पीडितेविरुद्ध विद्यार्थ्यांच्या एका गटाला एकत्र केले होते.
दरम्यान, या प्रकरणात प्राचार्य आणि विभागप्रमुख दोघांनाही यापूर्वीच अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता एबीव्हीपीच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.