"मुस्लिमांबद्दल अपशब्द बोलून हिंदू राष्ट्र होणार नाही, तर..."; धीरेंद्र शास्त्रींचा हिंदूंना खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:54 IST2026-01-31T15:53:42+5:302026-01-31T15:54:28+5:30
"'जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई', असे झाल्यानंतर, हिंदू राष्ट्राचा मार्ग मोकळा होईल."

"मुस्लिमांबद्दल अपशब्द बोलून हिंदू राष्ट्र होणार नाही, तर..."; धीरेंद्र शास्त्रींचा हिंदूंना खास सल्ला!
मुस्लीम समाजाला अथवा दुसऱ्या कुण्या समुदायासंदर्भात अपशब्द बोलून, त्यांना लक्ष्य करून भारत हिंदू राष्ट्र बनू शकत नाही. हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हिंदूंनी सर्वप्रथम आपल्यातील कुप्रथा आणि अंतर्गत त्रुटी सुधारणे गरजेचे आहे." असे मत बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मांडले आहे. ते बांदा येथील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
दिव्य हनुमंत कथेच्या दहा दिवसांनंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुन्हा बांदा येथे आले होते. आमदार प्रकाश द्विवेदी यांच्या निवासस्थानी आयोजित सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "हिंदूंनी माझी एक गोष्ट लिहून ठेवावी, केवळ विरोधातून हिंदू राष्ट्र निर्माण होणार नाही. आपल्या सनातनमधील परंपरेतील उणिवा दूर कराव्या लागतील, तेव्हाच भारत हिंदू राष्ट्र होईल. एवढेच नाही तर, 'जात-पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई-भाई', असे झाल्यानंतर, हिंदू राष्ट्राचा मार्ग मोकळा होईल."
यावेळी त्यांनी तलाकच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, "इतर ठिकाणी तीन वेळा शब्द उच्चारून तलाक होतो, पण आपल्याकडे जोपर्यंत २०-२५ वेळा कोर्टाच्या फेऱ्या होत नाहीत, तोवर तलाक होत नाही. ते कायदे पाळत असतील तर चांगली गोष्ट आहे."
धीरेंद्र कृष्ट शास्त्री पुढे म्हणाले, "जर आपण देवावर विश्वास ठेवाल, तर ते तुमचा विश्वास तुटू देणार नाही. मात्र, जर तुम्ही मध्येच अलीउल्लाह वाल्यांकडे जाल, कधी चादर चढवाल, कधी कँडल लावाल आणि मग म्हणाल की, हनुमान कृपा करत नाहीत. पूर्ण पणे इश्वरावर सोडून द्या."