१७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 08:05 IST2023-08-29T08:05:00+5:302023-08-29T08:05:11+5:30

मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

Abduction of 17 schoolgirls, violence erupts again in Manipur | १७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

१७ शाळकरी मुलींचे अपहरण, मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा

इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अपहरणाची खळबळजनक घटना सोमवारी समोर आली. बिष्णुपूर जिल्ह्यातील कामोंग येथे अज्ञात समाजकंटकांनी १७ शाळकरी विद्यार्थिनींचे अपहरण केले. या मुली १२ ते १४ वर्षे वयोगटातील आहेत. पोलिस व सुरक्षा दलांनी त्यांच्या सुटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे. 
सुदैवाने तीन मुली ‘अपहरणकर्त्यांच्या’ तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी कारमधून उडी मारली. शाळकरी मुलींच्या अपहरणासाठी अपहरणकर्त्यांनी दोन इको व्हॅनचा वापर केला. मुलींच्या अपहरणामागे खंडणी मागण्याचा हेतू असण्याची शक्यता आहे. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून १५ किमी अंतरावर असलेल्या कामोंग येथील हाओखंबन हायस्कूलमध्ये घडली, असे पोलिसांनी सांगितले. 
दरम्यान, मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी मंगळवारपासून सुरू हाेणारे विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

रिकाम्या घरांना लावली आग 
- मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात रविवारी दुपारी हल्लेखोरांनी तीन रिकाम्या घरांना आग लावली. अन्य एका घटनेत अज्ञात व्यक्तींनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडील दोन एके-४७ रायफलसह तीन बंदुका पळविल्या. 
- जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात जमलेल्या लोकांनी पोलिस दल व केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांकडे घटनास्थळी जाऊ देण्याची परवानगी मागू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या. 

अधिवेशन पुढे ढकला
- मणिपूरच्या दोन प्रमुख आदिवासी संघटनांनी रविवारी सरकारला आदिवासींच्या भावना आणि राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन २९ ऑगस्टचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली.

Web Title: Abduction of 17 schoolgirls, violence erupts again in Manipur