"भाजपाला अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय"; मनीष सिसोदियांवरून आपचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:55 IST2022-08-19T16:53:24+5:302022-08-19T16:55:40+5:30
मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यावरुन आम आदमी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.

"भाजपाला अरविंद केजरीवाल यांना संपवायचंय"; मनीष सिसोदियांवरून आपचा घणाघात
केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) शुक्रवारी (दि.19) सकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या घरी दाखल झाली. आम आदमी पार्टीच्या (AAP) नवीन दारू धोरणात आढळलेल्या अनियमिततेच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. या क्रमाने, मद्य धोरणावर एफआयआर नोंदवणाऱ्या एजन्सीने दिल्ली आणि एनसीआरमध्ये 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. मनीष सिसोदिया यांनी सीबीआयला तपासत मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले आहे.
मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यावरुन आम आदमी पक्ष सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. आप नेते राघव चढ्ढा यांनी मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा हा निव्वळ योगायोग नाही. भाजपालाअरविंद केजरीवाल यांना संपवायचे आहे असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रगतीची भीती वाटते. या देशातील सामान्य माणूस खूप हुशार आहे."
"अरविंद केजरीवाल यांनी 135 कोटी देशवासीयांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अरविंद केजरीवाल यांची लाट रोखणं इतकं सोपं नाही. आम आदमी पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना संपवण्यासाठी भाजपा नेमकं काय काय करणार काय माहीत. पण देशाचा सर्वसामान्य माणूस हे सर्व पाहत आहे आणि त्यांना हे का होतंय हे माहीत आहे. सिसोदिया यांच्यावर टाकलेल्या छाप्यांमध्ये सीबीआयला फक्त पेन्सिल आणि ज्योमेट्री बॉक्स मिळतील" असं देखील राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
सिसोदिया यांच्यावरील कारवाईवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की, ''मनीष सिसोदिया यांना जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षणमंत्री म्हणून घोषित करण्यात आले, पण सीबीआयचे पथक छापा टाकण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. अनेक अडथळे येतील, पण काम थांबणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर दिसणे आणि दिल्लीत शैक्षणिक क्रांती आणणे सोपे नव्हते.''
''हा पहिलाच छापा नाही, गेल्या 7 वर्षात मनीष सिसोदिया यांच्यावर अनेक छापे टाकण्यात आले. त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. माझ्यावर, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत यांच्यावरही छापे टाकण्यात आले, पण काहीही सापडले नाही. आताही त्यांना काहीही मिळणार नाही. सीबीआय आपले काम करत आहे, घाबरण्याची गरज नाही. सीबीआयला त्यांचे काम करू दिले पाहिजे, त्यांना आम्हाला त्रास देण्याचा आदेश मिळाला आहे.''