"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 15:34 IST2026-04-12T15:34:11+5:302026-04-12T15:34:30+5:30
"हे सरकार मदरशांसाठी ६०० कोटी रुपयांचे बजेट देते, मात्र, विकासासाठी त्यांच्याकडे निधी नाही," असे म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर थेट निशाणा साधला. ते रविवारी दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथील कावाखाली मैदानावर आयोजित एका भव्य जनसभेत बोलत होते.

"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
"यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 'महा जंगलराज'चा अंत निश्चित आहे. भाजपच्या रॅलीमध्ये ज्या प्रकारे जनसागर उसळत आहे आणि ज्या पद्धतीने जनतेचे समर्थन मिळत आहे, ते पाहता तृणमूल काँग्रेसचे हे 'निर्मम' सरकार आता सत्तेत राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे." एवढेच नाही तर, "हे सरकार मदरशांसाठी ६०० कोटी रुपयांचे बजेट देते, मात्र, विकासासाठी त्यांच्याकडे निधी नाही," असे म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर थेट निशाणा साधला. ते रविवारी दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी येथील कावाखाली मैदानावर आयोजित एका भव्य जनसभेत बोलत होते.
"तृणमूल सरकारने बंगाल उद्ध्वस्त केला"
आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदींनी बांग्ला आणि नेपाळी भाषेतून केली, त्यानंतर त्यांनी हिंदीत संवाद साधला. गेल्या १५ वर्षांपासून बंगालमध्ये असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले, या सरकारने बंगाल उद्ध्वस्त करण्याशिवाय दुसरे काहीही काम केले नाही. या सरकारने केवळ काळे कारनामे केले असून उत्तर बंगालची संपूर्ण उपेक्षा केली आहे.
"मदरशांसाठी ६०० कोटी, पण..."
ममता सरकारवर थेट आरोप करताना पंतप्रधन म्हणाले, "बंगाल सरकार उत्तर बंगालच्या विकासासाठी पुरेसा निधी देत नाही. उत्तर बंगालकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. मात्र हे सरकार मदरशांसाठी ६०० कोटी रुपये देते. मात्र, उत्तर बंगालच्या विकासासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी नाही. हे तृणमूल सरकार केवळ स्वतःच्या 'व्होट बँके'चे तुष्टीकरण करण्यातच व्यस्त आहे. येथे केंद्र सरकार विकासासाठी जो पैसा पाठवते, तोही येथील 'सिंडिकेट राज'कडून हडपला जातो, अशी बोचरी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ममता सरकारवर केली.