"१८ कोटी खर्चून बांधला हा अद्भुत नमुना"; भोपळमध्ये ९० अंशाचे वळण असलेल्या पुलावरुन नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:16 IST2025-06-12T16:13:40+5:302025-06-12T16:16:01+5:30
भोपाळमध्ये बनलेल्या या नव्या पुलामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

"१८ कोटी खर्चून बांधला हा अद्भुत नमुना"; भोपळमध्ये ९० अंशाचे वळण असलेल्या पुलावरुन नवा वाद
Bhopal Railway Overbridge: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका पुलाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. भोपाळच्या ऐशबाग स्टेडियमजवळ एक नवीन रेल्वे ओव्हरब्रिज जवळपास तयार झाला आहे. मात्र आता तो सुरु होण्यापूर्वीच वाद सुरू झाला आहे. हा वाद काम वेळेवर पूर्ण न होण्याबद्दल किंवा खर्च वाढण्याबद्दल नाही तर त्याच्या डिझाइनबद्दल आहे. ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलावरील धोकादायक ९० अंशाच्या वळणाने लोकांना धक्का बसला आहे. या पुलाचे ९० अंशाचे वळण अपघातांचे मोठे कारण बनू शकते असं लोकांचे म्हणणं आहे. मात्र यावर सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
भोपाळमध्ये बांधलेला हा ऐशबाग रेल्वे ओव्हरब्रिज धोकादायक वळणामुळे उद्घाटनापूर्वीच वादात सापडला आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित करत ९० अंशांच्या वळणामुळे भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. लोकांनी पुलाच्या डिझाइनवर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाहनचालकांना अचानक ९० अंशांवर वाहन वळवण्यात अडचणी येऊ शकतात असं लोकांचे म्हणणं आहे. नेटकऱ्यांनी या पुलाच्या कामावरुन सरकारवर टीका केलीय.
"भोपाळचा हा ऐशबाग रेल्वे ओव्हर ब्रिज, जो पीडब्ल्यूडीने १० वर्षांत बांधला आहे, तो एका चमत्कारासारखा आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीचे एक नवीन केंद्र बनणार नाही तर हे वळण एका मोठ्या अपघातालाही आमंत्रण देईल. ज्यांना दररोज हा पूल ओलांडावा लागेल त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. कारण हा पूल बनवणाऱ्यांनी फक्त औपचारिकता पूर्ण केल्या आहेत, जबाबदारी नाही, असं मनिष चौधरी नावाच्या युजरने म्हटलं. दुसऱ्या एका युजरने, ठ९० अंश कोनातून मृत्यू येईल. विकासाचा हा कोन मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उदयास आला आहे. यासाठी १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असं म्हटलं. आणखी एका युजरने कडक सूचना, ही तंत्रज्ञान देशाबाहेर जायला नको. हा अद्भुत नमुना १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे, असा टोमणा लगावला.
दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांना पुलाच्या डिझाइनबद्दल प्रश्न विचारला होता. "पुलाच्या बांधकामानंतर अचानक काही तज्ञ पुढे आले आहेत आणि त्यांनी बोलणे सुरू केले आहे. तर कोणताही पूल बांधताना अनेक तांत्रिक बाबी विचारात घेतल्या जातात.जर असे आरोप झाले तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल," असं मंत्री राकेश सिंह म्हणाले.