रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:31 IST2025-06-01T12:30:43+5:302025-06-01T12:31:15+5:30
तंबाखूच्या विक्रीतून कमाईपेक्षा नुकसान अधिक

रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचे देशात प्रमाण सातत्याने वाढत आहे. यामुळे भविष्यात गंभीर संकटाला तोंड द्यावे लागू शकते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमानुसार दरवर्षी सुमारे १८.३ लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य विविध आजारांमुळे होतो. असे असतानाही देशात दररोज ६,५०० नवे तरुण तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात होते.
... तर १५० वर्षे लागणार
या वेगामुळे दरवर्षाला तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये २४ लाख जणांची भर पडत असते. तंबाखूजन्य आजारांविरोधात सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला देशात तुलनेत फारच कमी यश मिळताना दिसत आहे. सध्या ज्या गतीने तंबाखू वापरावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार तंबाखू संपूर्णपणे सोडायला १५२ वर्षे लागतील. तोंडाचा कर्करोग, फुप्फुसे, हृदयविकार, स्ट्रोक, श्वसन आजार आदी आजारांसाठी तंबाखू हे प्रमुख कारण आहे.
२८ कोटींहून अधिक तंबाखू तसेच तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणारे लोक आहेत, अशी माहिती ग्लोबल अॅडल्ड टोबॅको सर्व्हेतून पुढे आली. १.८२ लाख कोटींचे आर्थिक नुकसान देशाला दरवर्षी तंबाखूच्या सेवनामुळे होते. हे जीडीपीच्या १ टक्क्यापेक्षा अधिक आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरकारला मिळणाऱ्या महसुलापेक्षा हे नुकसान अधिक आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या ध्येयांनुसार २०३० पर्यंत अकाली मृत्यू कमी करायचा असेल, तर तंबाखू सोडणे अत्यावश्यक आहे. तंबाखू सोडण्यासाठी १८००-११-२३५६ ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. ‘आम्ही तयार आहोत’ ही राष्ट्रीय मोहीम सुरू केली जाईल.
-डॉ. रामनाथ मिश्रा, संचालक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम