२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:06 IST2025-05-08T14:06:25+5:302025-05-08T14:06:58+5:30
या अपघातातील २ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
जालौन - उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुधवारी सकाळी नॅशनल हायवे २७ वर भीषण अपघात झाला. एका वेगवान कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर २ जखमी आहेत. या अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातातील मृतदेह पोस्टमोर्टमसाठी नेण्यात आले.
माहितीनुसार, अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. बहराइच जिल्ह्यातील ईकघरा गावातील ते रहिवासी होते. हे कुटुंब खासगी कारने २००० किमी प्रवास करत बंगळुरूला जात होते परंतु रस्त्यात काळाने घाला घातला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक वाहने या कोंडीत अडकले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातस्थळी जेसीबी, अन्य साहित्याच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटली.
या अपघातातील २ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील जखमी अंकितने सांगितले की, आमचे साडू बृजेश बंगळुरूत एका खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहेत. त्यांनी बंगळुरूत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता. त्यामुळे कुटुंबातील सगळेच तिथे जात होते. यावेळी त्यांची पत्नी संगीता, ३ महिन्याची मुलगी सिद्धिकासोबत होती. बंगळुरूचं अंतर २ किमी होते. त्यामुळे आळीपाळीने आम्ही कार चालवण्याचा प्लॅन केला होता. झाशीपर्यंत बृजेश यांना कार चालवायची होती. त्यानंतर मी चालवणार होतो असं त्याने सांगितले.
दरम्यान, सकाळच्या वेळी कार चालवताना बृजेश यांना डुलकी लागली, त्यामुळे कार अनियंत्रित झाली. आधी दुभाजकाला आदळली त्यानंतर एका ट्रकला जाऊन कार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज आल्याने आजूबाजूचे लगेच जमा झाले. या अपघातात बृजेश, प्रिती, संगीता, सिद्धिका आणि विनिता यांनी जागीच जीव सोडला. गॅस कटरच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर अपघातातील जखमी अंकित, कान्हा आणि मानवी यांना रुग्णालयात दाखल केले. त्यात उपचारावेळी मानवीचा मृत्यू झाला.