३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:35 IST2024-05-17T14:35:03+5:302024-05-17T14:35:37+5:30
Noorjahan Mango: भारतात आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे.

३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत
भारताचं राष्ट्रीय फळ असलेल्या आंब्याच्या देशभरात शेकडो प्रजाती आहेत. त्यात हापूस, केशर हे त्यातील सर्वात प्रसिद्ध आहेत. तसेच आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातींची वेगवेगळी वैशिष्टे दिसून येतात. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या सुमारे ३.५ किलो वजन आणि प्रतिकिलो १२०० रुपये दराने विक्री होणाऱ्या एका दुर्मीळ आंब्याची प्रजातीचं अस्तित्व सध्या संकटात आहे. मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडी येथील दुर्मीळ नूरजहाँ आंब्याची आता मोजकीच झाडं उरली आहेत. त्यामुळे या आंब्याची प्रजाती वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आंब्याची ही दुर्मीळ प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.
मुळचा अफगाणिस्तानमधील असलेला नूरजहाँ आंबा त्याच्या मोठ्या आकारासाठी ओळखला जातो. या आंब्याच्या एका फळाचं वजन सुमारे ३.५ ते ४.५ किलोच्या दरम्यान असतं. तसेत बाजारामध्ये या आंब्याला १ हजार ते १२०० रुपये प्रतिकिलो एवढी किंमत मिळते.
इंदूर विभागाचे आयुक्त (महसूल) दीपक सिंह यांनी बागायतीसंबंधीच्याएका बैठकीत सांगितलं की, अलिराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागामध्ये नूरजहाँ आंब्याला वाचवण्यासाठीचे प्रयत्न अधिक वेगाने केले पाहिजेत. त्यांनी अलिराजपूर जिल्ह्यात आंब्याच्या झाडांच्या घटत असलेल्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वनविभागाला टिश्यू कल्चरच्या माध्यमातून नूरजहाँची नवी रोपटी तयार करण्याचे आदेश दिले.
अलिराजपूरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर.के. यादव यांनी सांगितले की, नूरजहाँ आंब्याची फलधारणा होणारी केवळ १० झाडं उरली आहेत. मात्र आम्ही हार मानलेली नाही. आम्ही पाच वर्षांमध्ये वृक्षरोपन करून याची संख्या २०० पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही ही प्रजाती लुप्त होऊ देणार नाही. त्यांनी सांगितले की, काही दशकांपूर्वी नूरजहाँ आंब्याचं कमाल वजन हे ४.५ किलोपर्यंत जायचं. मात्र आता ते घटून ३.५ ते ३.८ एवढं कमी झालं आहे.