नवी दिल्ली - भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा जगभरात सुरू आहे. दरम्यान, मिशन शक्तीची पूर्वतयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती, गेल्या सहा महिन्यांपासून या मोहिमेच्या मिशन मोडवर काम सुरू होते. या मोहिमेच्या यशासाठी सुमारे 100 शास्त्रज्ञ काम करत होते, अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी दिली आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीआरडीओच्या प्रमुखांनी मिशन शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''मिशन शक्तीच्या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 100 शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती. तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.''
दरम्यान, अंतराळात संचार करणाऱ्या उपग्रहांना लक्ष्य करण्याचे तंत्र विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा तिसरा देश ठरला आहे. जेव्हा चीनने अशा प्रकारची चाचणी घेतली होती. तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध नोंदवला होता. मात्र भारताने केलेल्या या चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने फारसा विरोध केलेला नाही.