कुऱ्हेगावजवळ दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:49 IST2021-07-01T15:45:43+5:302021-07-01T15:49:06+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली - गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एका रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या धोकादायक वळणाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. संबंधित विभागाने या वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून या ठिकाणी अपघात होणार नाही, अशी सोय करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

अस्वली-गोंदे दुमाला रस्त्यावरील कुऱ्हेगावजवळ अपघातात दुचाकीची झालेली अवस्था.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अस्वली - गोंदे दुमालाकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा एका रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १) रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या धोकादायक वळणाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. संबंधित विभागाने या वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून या ठिकाणी अपघात होणार नाही, अशी सोय करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथून अस्वलीकडे जाणाऱ्या कुऱ्हेगावजवळ असलेल्या धोकादायक वळणावर अस्वली स्टेशन येथील रेल्वे कर्मचारी भरत गणेश माथे (२२, ह. मु. अस्वली स्टेशन) हे दुचाकीने (एमएच १५ एचई ८३९१) घरी जात होते. मात्र, समोरील वळणदार रस्ता असल्यामुळे त्यांचा घसरून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी खांदवे व अन्य कर्मचारी यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
अपघाती जागा
कुऱ्हेगाव येथील या वळणदार रस्त्यावर यापूर्वीदेखील चार व्यक्तिंना आपले प्राण गमवावे लागले असून, वारंवार या वळणाच्या ठिकाणी अपघात होत असतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वळणदार रस्त्याची दुरूस्ती करून मार्ग काढावा, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
गोंदे दुमाला ते अस्वली या रस्त्यावरून कामगारवर्ग, दुग्ध व्यावसायिक व शेतकरी यांची वर्दळ असल्याने या रस्त्याची दुरूस्ती करून धोकादायक वळणदार रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे. तसेच हा वळणदार असलेला रस्ता सरळ करण्यात यावा व या रस्त्यावर पथदीपांची सोय करण्यात यावी. यामुळे रात्री - अपरात्री मार्गक्रमण करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळेल व अपघातांना आळा बसेल.
- अंबादास धोंगडे, शिवसेना गणप्रमुख, वाडिवऱ्हे.