अझहर शेख, नाशिक : भारत देशामध्ये सर्वाधिक पर्यटन हे धार्मिक स्वरुपात होते. धार्मिक पौराणिक शहरे देशात बहुसंख्य असून त्यापैकी एक म्हणजे एकेकाळी गुलशनाबाद अशी ओळख मिरविणारी कुंभनगरी नाशिक. धार्मिक पर्यटनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आजही नाशिकमध्ये श्रध्देने येतात; मात्र या कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण सर्किट’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.
पंचवटी भागातील गोदाकाठावरील रामकुंडापासून अन्य प्राचीन १७ कुंडांची माहिती, गंगा-गोदावरी प्राचीन मंदीर व त्यांची महती, इतिहास, गोदावरीला लाभलेला पौराणिक वारसा अशी कुठलीही माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मल्याळम, तमीळ आदि भाषांमध्ये दर्शनी भागात उपलब्ध करुन देणे अपेक्षित असताना याकडे महापालिका व जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. यामुळे पर्यटकांच्या डोळ्यांना केवळ मंदिरे, नदी हेच दिसते, आपण नेमके काय बघतो आणि कशासाठी? त्याचे महत्त्व व वैशिष्टये काय ? या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने प्रभू रामचंद्र यांच्याशी संबंधित शहरांचा विकास तीर्थक्षेत्र म्हणून करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ‘रामायण सर्किट’ योजना मंजूर केली आहे. या योजनेतदेखील नाशिक पुण्यनगरीचा समावेश आहे.
‘तपोवन’ शोधावे कुठे?तपोवन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तप करण्यासाठी निवडलेले दंडकारण्य. हे तपोवन पंचवटीच्या पुर्वेला असून गोदावरी-कपिला नद्यांच्या संगमावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र आहे. तपोवनात असलेल्या धार्मिक आठ ठिकाणे अष्टतीर्थ म्हणून ओळखली जातात. याची कुठलीही माहिती या भागात दुर्देवाने वाचण्यासाठी कुठल्याही भाषेत पर्यटकांना अद्याप उपलब्ध झालेली नाही. ऋषी-मुनींनी अनुष्ठान, जप, ध्यानधारणा, यज्ञ यांसारखी तपश्चर्या केल्याची अख्यायिका सांगितली जाते. काळानुरूप दंडाकारण्य नाहीसे झाले असले तरी त्याची महती कायम आहे; मात्र ही महतीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून होत नाही, यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा येते. भारतामधील एकमेव पुरातन लक्ष्मण मंदिर तपोवनात आहे. या ठिकाणी रावणाची बहीण शुर्पनखेचे नाक लक्ष्मणाने कापले व ते गोदावरीत फेकल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. म्हणून या जागेला तपोवन असे नाव पडले; मात्र हे ‘तपोवन’ शोधावे कुठे अन् जाणावे कसे ? हाच प्रश्न सध्या येथे येणा-या पर्यटकांना पडत आहे.
महापालिकेच्या 'रामसृष्टी'च्या वैभवावर फिरले पाणीतपोवनामध्ये प्रवेश करणा-या पर्यटकांच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहुर उठत असावे. कारण तपोवनात येताना त्यांना कुठेही असे जाणवत नाही की आपण प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकाळातील तपोभूमीत आलो आहे किंबहुना त्याची जाणीव करुन देणारे तपोवनात असे काही प्रकल्प महापालिका व पर्यटन विभागाला राबविता आलेले नाही. रामसृष्टी उद्यान वगळले तर दुसरे येथे कोणताही नवनिर्माण प्रशासनाला करता आला नाही आणि ते करुन घेण्याची इच्छाशक्तीही लोकप्रतिनिधींनी दाखविली नाही. ‘रामसृष्टी’ हा सुंदर शब्द उद्यानाला देऊन प्रशासन मोकळे झाले; मात्र या उद्यानाची सुंदरता आणि वैभव जोपासण्यामध्ये ते सपेशल अपयशी ठरले ही वस्तुस्थिती. तपोवनामध्ये आलेल्या भाविक पर्यटकांना तपोवनाची पौराणिक माहिती व इतिहास कुठून आणि कसा मिळेल? हा मोठा प्रश्न असतो.
गोदा आरतीचा प्रस्ताव लालफितीतराज्य पर्यटन महामंडळाने नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने दहा लाख रुपयांचा गंगा-गोदा आरतीचा प्रस्ताव हरिद्वारच्या धर्तीवर मंजूरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठविला. मात्र या गोदावरी आरतीचा प्रस्तावाला मंजुरी मिळून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. यामुळे धार्मिक पर्यटनवृध्दीसाठी मैलाचा दगड ठरणारा हा उपक्रम सुरू होण्याअगोदरच लालफितीत अडकला. गोदावरी आरतीचा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवून काळ उलटला आहे. एकूणच राज्य पर्यटन मंत्र्यांचे अलिकडे शहरात झालेले दौरे, अन् घोषणा बघता नाशिकच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.