महिलांनी डिजिटल युगात सावधानता बाळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:31 IST2020-01-05T23:30:59+5:302020-01-05T23:31:16+5:30
बदलत्या काळात वाढता इंटरनेटचा वापर व त्यातून निर्माण होणारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना महिला व बालके अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. यातूनच महिलांनी डिजिटल युगात वावरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

मालेगावी सायबर सेफ वुमेन मोहिमेंतर्गत आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले. समवेत जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे.
मालेगाव : बदलत्या काळात वाढता इंटरनेटचा वापर व त्यातून निर्माण होणारे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना महिला व बालके अधिक प्रमाणात बळी पडत आहेत. यातूनच महिलांनी डिजिटल युगात वावरताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.
सायबर सेफ वुमेन या राज्यभर चालविण्यात येणाऱ्या मोहिमेअंतर्गत मालेगाव पोलीस विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सायबर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्र मात देसले बोलत होते. यावेळी नाशिक सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे, जिल्हा माहिती अधिकारी अर्चना देशमुख उपस्थित होत्या.
देसले म्हणाले, सायबर गुन्ह्यांबाबत वाढता आलेख व त्यातून निर्माण होणारे महिलांवरील अत्याचारांच्या जनजागृतीसाठी सायबर सेफ वुमेन ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो, यावर आपली सायबर सुरक्षा अवलंबून असते. समाजमाध्यमांचा वापर करताना विद्यार्थ्यांनी इंटरनेटवरील फसव्या जाहिरातींना, संदेशांना बळी न पडता त्यामागील सत्यता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तरुणींनी, महिलांनी विविध समाजमाध्यमे हाताळताना आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कुणाकडे जाणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायबर साक्षरतेबाबत केलेल्या आवाहनाचा संदेश दाखविण्यात आला. विद्यार्थिनी, शिक्षक व पालक उपस्थित होते.