लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक: योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे २०१५ मध्ये देशात योग विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी केंद्रासह राज्यातही भाजप युतीचे सरकार होते. १० वर्षं उलटून गेल्यावरही नाशिकमध्ये योग विद्यापीठ उभारणीची अद्याप प्रतीक्षा आहे.
धार्मिक, नैसर्गिक, भौगोलिक महत्त्व लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर किंवा इगतपुरी तालुक्यात योग विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी नाशिककरांतर्फे तत्कालीन केंद्रीय आयुष राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मुंबईत त्यासंदर्भात ‘मेक इन नाशिक’ उपक्रमाच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केवळ आश्वासने मिळाली. प्रस्तावानंतर तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही योग विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण होण्याची अद्यापही प्रतीक्षा आहे.
राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकची आरोग्यदायी हवा, मुबलक पाणी अन्य शहरांच्या तुलनेत कमी प्रदूषण असल्याने योग विद्यापीठासह वेलनेस सेंटर उभारणे शक्य असल्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. त्यानंतर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात वेलनेस सेंटर उभारण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून घोषणा झाली. गत पंचवार्षिकमध्येही वेलनेस सेंटरचा प्रस्ताव देण्यात येऊन तो रेंगाळलेला आहे.
का होतोय विलंब?पर्यटन विभागाला जागा मिळत नसल्याने विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे. राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी त्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही गाडी पुढे सरकली नाही. नाशिकमध्ये सर्वसमावेशक असे आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ, वेलनेस सेंटर निर्माण झाल्यास नाशिक आणि महाराष्ट्राच्या लौकिकात निश्चितच भर पडेल. आंतरराष्ट्रीयदृष्ट्यादेखील तो देशाच्या अभिमानाचा मानबिंदू ठरू शकेल.