मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:40 IST2019-02-21T17:36:11+5:302019-02-21T17:40:03+5:30
मनमाड : नार पारच्या पाण्यासाठी शेतकरी लॉँग मार्चला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला न देता राज्यालाच मिळाले पाहिजे या मागणीसाठी मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

मनमाड बचाव समितीतर्फे पाणीप्रश्नी धरणे आंदोलन
जिल्ह्यातील पेठ सुरगाणा या भागातून नार पार, पिंजाळ, दमणगंगा, ताण बाण आदी नद्यांचे पाणी वाहून अरबी समुद्रात जाते. केंद्र शासनाच्या चितळे आयोगाने सर्वेक्षण करून समुद्रात वाहून जाणारे १५७ टीएमसी पाणी नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यांना दिल्यास हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याबरोबरच मराठवाडा व नगर जिल्ह्यालाही या पाण्याचा फायदा होणार आहे. मात्र महाराष्टÑ शासन, गुजरात सरकार व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार होत असून राज्यातील वाहून जाणारे १५७ टीएसी पाणी गुजरात राज्याला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हक्काचे पाणी महाराष्टÑालाच मिळाले पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी किसन सभेने २० फेबृवारीपासून नाशिक ते मुंबई असा लॉँगमार्च काढला आहे. राज्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या या लॉँगमार्चला पाठिंबा व्यक्त करून राज्याला पाणी मिळालेच पाहिजे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे पुंडलीक कचरे, रमेश खरे, निवृत्ती खालकर, परशराम शिंदे, योगेश बोदडे, रामदास पगारे, अशोक परदेशी, भाऊसाहेब अहेर आदी सदस्य उपस्थित होते.