त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:41 IST2020-12-25T19:39:10+5:302020-12-26T00:41:43+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मूलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा
मूलवड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वळण सावरीचा माळ, उंबरघोडा, घोटबारी, काकडवळण आदी गावांमध्ये डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या गावातील पाणीटंचाई त्वरित दूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आहेर यांना सिताराम चौधरी व त्यांच्या सहका-यांनी साकडे घातले आहे. तथापि, मूळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी या गावांना पाणीटंचाई असल्याची कबुली देताना सांगितले, की अजून पाण्याचे स्रोत सहसा आटले नसले तरी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत झपाट्याने कमी होत गेले तर त्यावेळी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यापेक्षा सध्या या राखीव असलेल्या विहिरींवरून पंपिंगद्वारे वळण चौरापाडा, काकडवळण, घोटबारी, उंबरघोडा आदी गावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे तालुक्यात इतरत्र पाणीटंचाई भासत असल्यास दीड-दोन किलोमीटर परिसरातून पाणी आणून ती समस्या सोडविता येते, असेही परस्परविरोधी सूर ऐकावयास मिळत आहेत.