वातावरण बदलामुळे द्राक्षबागांवर किटकांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:23 IST2018-10-31T00:22:17+5:302018-10-31T00:23:13+5:30
परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

वातावरण बदलामुळे द्राक्षबागांवर किटकांचा प्रादुर्भाव
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिली असून, वातावरणात कमालीची आर्द्रता वाढू लागल्याने त्याचा थेट दुष्परिणाम द्राक्षबागांवर होत आहे. द्राक्षांवर किटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, तो नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण यावर्षी अल्प राहिल्याने द्राक्षांना पुरेसे पाणी मिळणेही अवघड झाले आहे. एकूणच द्राक्ष बागायतदार वातावरण बदलाच्या या दुष्परिणामामुळे संकटात सापडल्याचे चित्र आहे.
नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जात असल्याने वायनरींची संख्याही वाढली आहे. येथील वाइन, द्राक्षांना आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मागणी आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षबागांवर ‘संक्रांत’ आली आहे. वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्राक्ष उत्पादक मदन ढेरिंगे यांनी सांगितले. द्राक्षाचा मणी तयार होत असताना वातावरण बदल, मुबलक पाण्याच्या अभावामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. हिरवे तुडतुडे, अळीचे प्रमाण अधिक झाल्याने किटकनाशक फवारणी अधिक प्रमाणात शेतकºयांना करावी लागत आहे. जमिनीमध्ये पाण्याची पातळी घटल्याने द्राक्षांच्या घडाचा आकारही कमी राहत आहे. द्राक्षबागांमधील झाडांवर फळधारणाही कमी-जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम जाणवणार आहे.
पावसाची हुलकावणी
सप्टेंबर छाटणी शेतकºयांनी पावसाच्या भरवशावर केली; मात्र त्यानंतर पाऊस झाला नाही, परिणामी द्राक्ष उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. जानेवारीमध्ये या छाटणीचा माल बाजारात येईल त्यावेळी आवक जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी द्राक्षबागांमध्ये उत्पादनाच्या तफावतीमुळे त्याचा परिणाम आवकेवर निश्चित स्वरूपात होईल.