अपघातात दोन दुचाकी चक्काचूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:44 IST2020-06-06T21:35:03+5:302020-06-07T00:44:15+5:30
बलसाड रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका मालवाहू ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कडेला ऊभ्या असलेल्या दोन दुचाकी अक्षरश: चिरडून टाकला.

अपघातात दोन दुचाकी चक्काचूर
पेठ : शहरातील बलसाड रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका मालवाहू ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कडेला ऊभ्या असलेल्या दोन दुचाकी अक्षरश: चिरडून टाकला.
लॉक डाऊनमध्ये व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पेठ शहरातील ग्राहकांची गर्दी वाढत असतांना जून्या तहसील कार्यालयासमोरील चौकात गर्दीच्या ठिकाणी दुचाकी ऊभ्या करून खरेदी करत असतांना नाशिककडून गुजरातकडे जाणार्या ट्रक क्र मांक एमएच-१२-एआर-२२९५ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुचाकींवर जाऊन आदळला यामध्ये दुचाकी क्र मांक एमएच -१५ -एफएक्स-५६८८ व क्र मांक एमएच -१५- जीजी-५१५२ या दोघांचा चक्काचूर झाला. शेजारीच दुकानात गर्दी होती मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही. मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत ट्रकचालकाला चोप दिला. याबाबत पेठ पोलीसात नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्ग हा पेठ शहरातून जात असल्याने बाजारपेठेत होणारी गर्दी आणी त्यातून मार्ग काढणारी अवजड वाहने यामूळे या ठिकाणी कायम वाहतूकीची कोंडी होत असते. त्यात रस्त्यावर बिनधास्त वाहने ऊभी करणार्यांवर पोलीसांचे नियंत्रण नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला. पेठ बायपाससाठी ८५ कोटी मंजूर झाल्याचा विषय सद्या चर्चेत असून श्रेय कोणीही घ्या मात्र लवकरात लवकर बायपास करून वाहतूकीची डोकेदु:खी कमी करा अशी सामान्य जनतेकडून मागणी होत आहे.