पाणी विकत घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST2020-02-25T23:18:16+5:302020-02-26T00:12:23+5:30
महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पाणी विकत घेण्याची वेळ
इंदिरानगर : महापालिकेचा पूर्व विभाग आणि सिडको विभागाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचा सामना करावा लागलेल्या नागरिकांना स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
सुमारे दहा दिवसांपासून इंदिरानगर परिसरातील पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, शास्त्रीनगर, एलआयसी कॉलनी या भागात अपुºया दाबाने तसेच कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा अद्याप सुरू झालेला नसतानाच तत्पूर्वी कृत्रिम पाणीटंचाई सुरू झाल्याने काही सोसायट्यांतील नागरिकांना लोकवर्गणी काढून खासगी टॅँकरद्वारे पाण्याची तहान भागवावी लागत आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात मुबलक पाणी असतानाही निव्वळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय असल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकून नासर्डी ते पाथर्डी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यासाठी पाथर्डी फाटा येथे मुकणे धरणातून आलेल्या जलवाहिनीच्या वॉल्व्हला कुलूप लावण्यात आले होते. परंतु काही दिवसांतच या वॉल्व्हचे कुलूप काढण्यात आले व पाण्याची पळवापळवी सुरू झाली.
बैठका घेऊनही : समस्या कायम
गेल्या प्रभाग सभेत नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी यांसह सर्व सदस्यांनी प्रभागाच्या
पाणीप्रश्नावरून ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त व पाणीपुरवठा अधिकाºयांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात आयुक्त व महापौरांसमवेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बैठका घेतल्या तरीदेखील पाणीप्रश्न ‘जैसे थे’ राहिला आहे.