उपजिल्हा रुग्णालयाचे ग्रहण सुटेना
By Admin | Updated: July 15, 2017 00:57 IST2017-07-15T00:56:56+5:302017-07-15T00:57:14+5:30
चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले असून, रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचे ग्रहण सुटेना
महेश गुजराथी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथे मुंबई - आग्रा महामार्गावर नेहमीच अपघात होत असल्याने शासनाने सुमारे ७० खाटांचे रुग्णालय दिले असताना केवळ सोयीसुविधा व यंत्रसामग्रीचा अभाव, डॉक्टरांची अपुरी संख्या यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासले असून, रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत तालुक्यातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयात मार्च महिन्यात रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तुकाराम सोनवणे यांनी वैद्यकीय शिक्षण नसलेल्या व्यक्ती औषधोपचार सुरू करत असल्याचा प्रकार नजरेस आणून दिला होता. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे, निवासी वैद्यकीय अधिकारी होले यांच्या कानावर हा प्रकार टाकला होता. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदाकिनी बर्वे यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवल्याने त्यांची बदली झाली होती. आता गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मनमाड येथील डॉ. नरवणे यांच्याकडे या रुग्णालयाचा अतिरिक्त भार आहे. त्यांच्याकडे मनमाड येथील भार असल्याने ते चांदवड येथे आठवड्यातून एक दिवस येतात. परिणामी ते पाहिजे तितके लक्ष या उपजिल्हा रुग्णालयाकडे देऊ शकत नाहीत. येथे सद्यस्थितीत १२ डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे. मात्र सध्या नऊच जागा भरल्या असून, त्यात तीन जागा रिकाम्या आहेत. एक पद रिकामेच आहे. यापैकी तीन डॉक्टर प्रतिनियुक्तीवर, एक नगरसूल येथे, एक जिल्हा रुग्णालयात, एक देवळा उपजिल्हा रुग्णालयात, एक डॉक्टर स्त्रीरोग चिकित्सकच्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. परंतु हे डॉक्टर बालरोग तज्ज्ञ असल्याचे समजते. सध्या नावाला १२ डॉक्टर पटावर असून, डॉ. सुशीलकुमार शिंदे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. फैज्जल हे सर्जन असून, डॉ. सोनवणे हे भूलतज्ज्ञ आहेत तर डॉ. विकास गांगुर्डे हे चारच डॉक्टर येथे कार्यरत आहेत. यामुळे चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या रुग्णालयात इन्व्हर्टर चार्जिंगसाठी बॅटरी नाही, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी एका महिलेची प्रसूती येथील डॉक्टरांनी मोबाइलच्या प्रकाशात केल्याचा प्रकार घडला. शवविच्छेदन कक्षातील सर्वच दरवाजे व खिडक्या तुटल्या असून, येथे शव ठेवल्यानंतर त्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो या रुग्णालयाचा नागरिकांना उपयोग होत नसल्याने वरिष्ठांनी त्वरित लक्ष द्यावे, यासाठी कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधीक्षक नेमावे, अशी मागणी होत आहे.