विद्यार्थ्यांना सकारात्मकतेसह पोषक वातावरण गरजेचे : तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST2018-09-27T00:11:36+5:302018-09-27T00:13:00+5:30
आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकतील, असे प्रतिपादन बाल शिक्षण अभ्यासक राजीव तांबे यांनी केले.

विद्यार्थ्यांना सकारात्मकतेसह पोषक वातावरण गरजेचे : तांबे
नाशिक : आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकतील, असे प्रतिपादन बाल शिक्षण अभ्यासक राजीव तांबे यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये बुधवारी (दि.२६) सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तांबे पुढे म्हणाले, मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. शिकू शकतो असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करून दिला पाहिजे. ‘हे करू नका, ते करू नका’ असे न म्हणता त्यांना सकारात्मक पद्धतीने वाढवले पाहिजे. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, डॉ. मुग्धा लेले, ओमप्रकाश रावत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. यावेळी नामदेव वाजे, संजय पवार, डॉ. दिलीप पवार, संजय येशी, जगदीश डिंगे, शरद गिते, बलराम माचरेकर, भारती पाटील या जिल्हाभरातील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुरेखा राजपूत, उमेश देशमुख, मृदुला बेळे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या पाठीवर थाप
मुलांना समजून सांगितले तरच ते नको असलेल्या गोष्टी करणार नाहीत व दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ पालकांवर येणार नाही. त्यांच्या चुकांसह त्यांचा स्वीकार करा, त्यांच्याशी मैत्री करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे पवार यांनी नमूद केले.