चंदनपुरीत शिवमल्हारचा उधळला भंडारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 07:52 PM2021-01-21T19:52:57+5:302021-01-22T00:35:01+5:30
मालेगाव : तालुक्यातील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र चंदनपुरीच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून होते. गेल्या दशकापासून चंदनपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. सत्ताधारी व सहकारी गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने यंदाची निवडणूक चुरशीची झाली. निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने आले आणि सत्तांतर होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. दरम्यान, नवीन पॅनेलप्रमुख विनोद शेलार हे सर्वसाधारण गटाचे असल्याने आरक्षण सर्वसाधारण निघाल्यास सरपंचपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता आहे
चंदनपुरी ग्रामपंचायतीत पाच प्रभागांत १५ सदस्य आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे माजी सरपंच राजेंद्र पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पॅनेल निर्मिती केली होती. मात्र शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते विनोद शेलार यांनी सत्ताधाऱ्यांसमोर पर्याय म्हणून पॅनेल उभे करीत तगडे आव्हान दिले. माजी सरपंच पाटील यांच्या नेतृत्वाखालील साई मल्हार पॅनेलमध्ये काही शिवसैनिक व राष्ट्रवादीचे काही पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते होते. शेलार यांच्या शिवमल्हार पॅनेलमध्ये चंदनपुरीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची व युवकांची मोठी फळी उभी राहिली होती. त्यामुळे पाटील यांच्या पॅनेलपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते. सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख पाटील यांच्या गटाचे नितीन पाटील यांनी माघार घेत बिनविरोध निवडीसाठी तडजोड केली व त्यांच्या पत्नीला अन्य वॉर्डात उमेदवारी दिली; मात्र पाटील यांच्या पत्नी पराभूत झाल्या. निवडणुकीत हासुद्धा विषय चर्चिला गेला. सत्ताधारी साईमल्हार पॅनेलला, तर विनोद शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिव मल्हार पॅनेलला ११ जागा मिळाल्या. नवीन नेतृत्वाकडे गावकऱ्यांनी गावाचा कारभार सोपवला आहे. शेलार हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. चंदनपुरीचे सरपंच आरक्षण सर्वसाधारण गटासाठी निघाले, तर साई मल्हार पॅनेलचे नेते शेलार यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडू शकते. अन्यथा कृषीमंत्री दादा भुसे व शेलार यांनी सुचवलेल्या सदस्याला सरपंचपद बहाल होणार आहे.