१९हजार प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 20:04 IST2020-02-08T20:01:26+5:302020-02-08T20:04:19+5:30

प्राधिकरणाच्या वतीने राज्यभरात शनिवारी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली होती

Settlement of 9,000 cases in National Public Court | १९हजार प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत निपटारा

१९हजार प्रकरणांचा राष्ट्रीय लोकअदालतीत निपटारा

ठळक मुद्दे१ लाख ६ हजार ७१७ दावापूर्व दाखल प्रकरणेदावा दाखलपूर्व प्रकरणांपैकी १७ हजार ९३९ प्रकरणांचा निपटारा

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्ह्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.८) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत प्रलंबित व दावा दाखलपूर्व अशा एकूण १९ हजार ६४४ प्रकरणांचा निपटारा झाला.
प्राधिकरणाच्या वतीने राज्यभरात शनिवारी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रमुख न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत भरविण्यात आली होती. प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणे अनेक महिन्यांपर्यंत खितपत पडलेली असतात. त्यामुळे त्याच्यावर न्यायनिवाडा होत नाही परिणामी वादी-प्रतिवादी दोघांनाही त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकरणांचा जलदगतीने एकाचवेळी न्यायनिवाडा व्हावा, या उद्देशाने विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येते. शनिवारी झालेल्या लोकअदालतीमध्ये फौजदारीसह व्यावसायिक, कौटुंबिक, अपघाती अशी विविध प्रकारची प्रकरणे समोर आली. जिल्ह्यातून प्रलंबित प्रकरणांपैकी १० हजार ३९९ प्रकरणे ठेवण्यात आली तसेच १ लाख ६ हजार ७१७ दावापूर्व दाखल प्रकरणेही ठेवण्यात आली. त्यामध्ये ७३५ दिवाणी, २ हजार ९२१ तडजोडपात्र फौजदारी, २०४ अपघात नुकसानभरपाई, ५२९ कौटुंबिक वाद, २ हजार ११५ धनादेश न वटणे अशा विविध प्रकरणांचा समावेश होता. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी (कलम १३८) एकूण ५०९, फौजदारी ७४६, बॅँकेची ४५, मोटार अपघात प्रकरणांपैकी ९५, कामगार विषयक १, कौटुंबिक वादाची १३५, भूसंपादनविषयक १४ व दिवाणी दावे १३५, अन्य ८ अशी १ हजार ७०५ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली निघाली आहेत. दावा दाखलपूर्व प्रकरणांपैकी १७ हजार ९३९ प्रकरणांचा निपटारा झाला. तसेच न्यायालयात असे प्रलंबित व दावादाखल प्रकरणे मिळून १९ हजार ६४४ प्रकरणे जिल्ह्यात निकाली निघाली. दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात लोकअदालत सर्वत्र शांततेत पार पडली. लोकअदालतीत पक्षकारांसह वकिलांनीही चांगला सहभाग घेतला. अनेक वर्षांपासून प्रलंबित लहान-मोठे दावे निकाली निघाल्याने पक्षकारांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

 

Web Title: Settlement of 9,000 cases in National Public Court