समृद्धी महामार्ग: नागपूर-ठाणे आता ८ तासांत! ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा आज होणार खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:30 IST2025-06-05T12:29:47+5:302025-06-05T12:30:44+5:30
इगतपुरी ते आमने या ७६ किमीच्या डोंगराळ भागात ‘समृद्धी’वर पाच बोगदे आहेत

समृद्धी महामार्ग: नागपूर-ठाणे आता ८ तासांत! ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा आज होणार खुला
लोकमत न्यूज नेटवर्क, घोटी (नाशिक) : विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्ह्यांना विकासाकडे घेऊन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी इगतपुरी येथे समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कोनशिला अनावरण व मुंबई मार्गिका बोगद्याच्या प्रवेशस्थळी फीत कापून दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. १२:३५ वाजता समृद्धी महामार्गाची चित्रफीत दाखविली जाणार असून, १२:४० वाजता ठाणे खाडी पूल क्रमांक ३ दक्षिण वाहिनी मार्गिकेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता अडीच वर्षांनी संपूर्ण महामार्ग सेवेत येत आहे. नागपूरहून वाहनांना १२० किमी वेगाने मुंबईच्या वेशीवर ८ तासांत पोहोचता येईल.
पंतप्रधान मोदी यांनी केले होते लोकार्पण
समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते. समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (कोकणमठाण) ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर २० इंटरचेंजदरम्यान एकूण ८० किमी लांबीचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, तर समृद्धी महामार्गाच्या भरवीर इंटरचेंज ते इगतपुरीपर्यंतच्या २५ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण दि. ४ मार्च २०२४ रोजी तत्कालीन बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले होते. एकूण ७०१ किमीपैकी ६२५ किमी लांबीचा हा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू आहे. आता, या महामार्गाचा उर्वरित ७६ किमी लांबीचा मार्ग (इगतपुरी ते आमणे) वाहतुकीस गुरुवारी खुला होणार आहे.
सर्वांत मोठा बोगदा
इगतपुरी ते आमने या ७६ किमीच्या डोंगराळ भागात ‘समृद्धी’वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी आहे. त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीच्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ मिनिटांमध्ये कापता येईल. या भागात ११ किमीचे दुहेरी व्हायडक्ट उभारण्यात आले आहेत. अवघड असा ८४ मीटर उंचीचा पूल उभारला आहे.