ऋषी कपूर यांची नाशिकमधील धर्मस्थळांवरही श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:22 IST2020-04-30T22:45:52+5:302020-04-30T23:22:44+5:30

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

 Rishi Kapoor's faith in religious places in Nashik | ऋषी कपूर यांची नाशिकमधील धर्मस्थळांवरही श्रद्धा

ऋषी कपूर यांची नाशिकमधील धर्मस्थळांवरही श्रद्धा

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी आपल्या चॉकलेट हिरोच्या सोशल मीडियावर आठवणी जागवल्या. ऋषी कपूर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने नाशिकमध्ये चित्रीकरणा व्यतिरिक्तही येऊन गेले आहेत. विशेषत: त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर नाशिकरोड येथील अण्णा गणपती मंदिरातही त्यांनी भेट दिली होती.
गेल्या दोन दिवसांत बॉलिवूडने दोन मोठे स्टार गमावले आहेत. इरफान खान यांच्या पाठोपाठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (दि.३०) सकाळी निधन झाले. त्यामुळे चाहत्यांंना मोठा धक्का बसला. ऋषी कपूर यांच्या काळ जागवणारी आणि त्यांना चॉकलेट हिरो मानणारी एक पिढी आहे, त्या साऱ्यांनाच ऋषी कपूर यांचे जाणे धक्कादायक ठरले आहे. सकाळी या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, फाळके फिल्म सोसायटीचे मुनीराम अग्रवाल यांनी २००० मधील आठवण जागवली. नाशिक ही चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असल्याने नाशिकमध्ये आलेल्या प्रत्येकाला सोसायटीच्या वतीने फाळके यांची प्रतिमा भेट दिली जाते. ‘कुछ खट्टी कुछ मिठी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ऋषी कपूर तसेच अभिनेते सुनील शेट्टी आणि काजोल हे नाशिकमधील तारांकित हॉटेलमध्ये उतरल्याचे कळल्यानंतर सोसायटीच्या वतीने त्यांना प्रतिमा देण्यात आली. यावेळी अंबडकर (स्व.) प्रकाश काळे आदी उपस्थित होते.
ऋषी कपूर हे नाशिकनजीक असलेल्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येऊन गेले आहेत. तसेच सुमारे दीड वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. त्यानंतर नाशिकरोड येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्ध पीठम येथे त्यांनी भेट दिली. येथील गणरायाच्या विशाल मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील नवग्रह मंदिरात मंगळ ग्रहाची दोन तास पूजा केली होती, असे प. पू. अण्णा गुरुजी यांनी सांगितले.
---------
अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर आज लगेचच ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बालवयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी शेवटपर्यंत आपल्या अभिनयातून चित्रपट रसिकांची मने जिंकली. चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून, ऋषी कपूर याच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

Web Title:  Rishi Kapoor's faith in religious places in Nashik

टॅग्स :Nashikनाशिक