राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:49 IST2019-08-22T15:47:24+5:302019-08-22T15:49:40+5:30
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच्या मार्गाने कार्यकर्ते जमले होते.

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता
नाशिक :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच्या मार्गाने कार्यकर्ते जमले होते.
मुंबई-पुण्यानंतर नाशिक शहर हे राज ठाकरेंचा गड मानला गेला होता. राज यांनी मराठीसाठी आंदोलने सुरू केल्यानंतर सर्वाधिक आक्रमकता नाशिकमध्येच दिसली होती. आता काही वर्षांपासून मनसे थंड झाली असून, अनेक नेते नगरसेवक अन्य पक्षात गेले आहेत. त्यानंतरही राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आणि राज यांना गुरुवारी (दि.२२) चर्चेसाठी हजर राहण्यास सांगितले असल्याने शहरात आंदोलने होण्याची शक्यता होती. शहरात अशांतता निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. तर राज ठाकरे यांनीदेखील शांततेचे आवाहन केले होते. या सर्वांचा परिपाक म्हणून शहरात आंदोलने झाली नसल्याचे मनसेचे म्हणणे आहे. केवळ काही कार्यकर्ते राजगडावर जमले होते.
दरम्यान, शहरात नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारची कृती, आंदोलने करू नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी दिले होते. प्रमुख नेत्यांना त्यांनी फोनदेखील केले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी लोकमतला सांगितले.