साकोरा परिसरात पावसाची ओढ; शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 01:00 IST2018-07-29T01:00:33+5:302018-07-29T01:00:52+5:30
पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अजून पुरेसा पाऊस नसल्याने अवघ्या चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यातही वीस टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर साठ टक्के शेतीतील मातीची ढेकळं फुटलेली नाहीत.

साकोरा परिसरात पावसाची ओढ; शेतकरी चिंतित
साकोरा : पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अजून पुरेसा पाऊस नसल्याने अवघ्या चाळीस टक्के पेरण्या झाल्या आहेत, तर त्यातही वीस टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तर साठ टक्के शेतीतील मातीची ढेकळं फुटलेली नाहीत. तसेच पाऊस नसल्याने गावात गेल्या तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने गावकºयांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही पर्यायव्यवस्था न केल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला; मात्र साकोरा परिसरात अद्यापपर्यंत चांगला पाऊस झाला नसल्याने जमिनीला पुरेशी ओलदेखील न होता अजूनही मातीची ढेकळंदेखील फुटलेले नाहीत. काही हलक्या जमिनीत शेतकºयांनी पेरणी केली होती; मात्र कसदार जमिनीत अजूनही पेरणी झाली नसल्याचे चित्र आहे. परिसरातील अवघ्या ४० टक्के भागात पेरण्या झाल्या होत्या; मात्र पैकी २० टक्के भागात दुबार पेरणी झाल्याचे चित्र आहे, तर ६० टक्के जमिनीत अजूनही मातीची ढेकळं दिसून येत आहेत.
तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद
पावसाळा सुरू होऊन तब्बल दोन महिने होत आले तरी पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झाले नसून गावासह परिसरातील सर्व विहिरी पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. नदी-नाल्यांचे पारणे फिटले की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जलस्वराज्य योजनेच्या मन्याड शिवारातील उद्भव विहिरीच्या आजूबाजूला वाळूमाफियांनी मोठे खड्डे केल्याने सदर विहिरीतील पाणीसाठा खाली गेल्याने गावात तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतली असून, गावकºयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आता तर गावातील खासगी बोअरवेल, वेशीजवळील हातपंप आणि उपशावर आलेली गावकीच्या विहिरीच्या आधारावर सध्या नागरिकांची तहान भागविली जात आहे; मात्र तरीही टंचाई जाणवत असल्याने संपूर्ण दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.