नवी दिल्ली - गायक अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी, मनसेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यास विरोध केला. पाकिस्तानमधून कोण इथं येऊन जय मोदी हा नारा देत असेल तर त्याला देशाचं नागरिकत्व दिलं जातं अन् पद्मश्री पुरस्कार मिळतो हे स्पष्ट उदाहरण आहे, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी अदनान सामी आणि केंद्र सरकारवर टीका केलीय.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये, बॉलिवूड, कला, क्रीडा, साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. गायक अदनाना सामी यांनीही राष्ट्रपतींच्याहस्ते हा पुरस्कार स्विकारला. मात्र, अदनाना सामी यांनी पुरस्कार स्विकारताच मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसेनंही व्यक्त केली होती नाराजी
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं ते अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.