ओतूर परिसरात कांदा लागवड सर्वत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:51 IST2020-12-22T22:43:08+5:302020-12-23T00:51:27+5:30
ओतूर : अवकाळी रिमझिम पावसामुळे थांबलेली उन्हाळ कांदा लागवड परिसरात चार दिवसांपासून सर्वत्र सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ओतूर परिसरात कांदा लागवड सर्वत्र सुरू
ओतूर : अवकाळी रिमझिम पावसामुळे थांबलेली उन्हाळ कांदा लागवड परिसरात चार दिवसांपासून सर्वत्र सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी महागडे कांदा बी घेऊन केलेली लागवड पूर्णपणे वाया गेली होती. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपये किलो दराने नगर जिल्ह्यातील गावातून बियाणे आणून शेतकऱ्यांनी उळे टाकले होते. त्याचीही उगवण समाधानकारक झाली नाही.
अगोदरच रब्बी हंगाम लांबल्याने व रोपांची टंचाई यामुळे बळीराजा हैराण झाला आहे, तसेच मागील वर्षाचा शिल्लक कांदा खराब होत असून, भाव कमी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मजुरांची टंचाई सर्वत्र जाणवत असल्याने ठेका पद्धतीने कांदा लागवड केली जात आहे.
ओतूर धरणातील पाणी गळतीमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे. रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले भाव तसेच सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मर्यादित वेळेत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लागवड पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.