नाशिक : "डेल्टा प्लस' या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकवन्यजीव विभागाने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य व आजुबाजुची पर्यटनस्थळे 'वीकेण्ड'ला बंद ठेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांलगतच्या पर्यटनावर निर्बंध आल्याने अभयारण्य भागात पर्यटकांची झुंबड उडत होती. यामुळे अभयारण्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी शनिवार, रविवारी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.
राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा प्लस चा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले. याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे दिसत असताना नाशिक वनवृत्तामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, नांदुरमध्यमेश्वर, जळगावचे यावल आणि धुळे येथील अनेर डॅम अभयारण्यांच्या वाटा ८जून रोजी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.