आत्मसन्मानासाठी दिव्यांगांचे पुनर्वसन करण्याची गरर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:21 IST2019-12-22T22:24:00+5:302019-12-23T00:21:43+5:30
समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले.

बहुद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेच्या पाहणीप्रसंगी बोलताना जीवन कायंदे. समवेत बबन कदभाने, वैशाली सोनगिरे, अजय राठी, अर्जुन कोकाटे आदी.
येवला : समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जीवन कायंदे यांनी केले.
येवला येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या बहुद्देशीय अपंग निवासी कार्यशाळेच्या विविध प्रकल्पांची कायंदे यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या कार्यक्र मात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निफाड येथील उद्योजक बबन कडभाने होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सेवा समितीच्या धुळे येथील कार्यकर्त्या वैशाली सोनगिरे, निफाड येथील प्रगतिशील शेतकरी सुरेश दाते, नाशिक येथील सनदी लेखापाल अजय राठी, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे उपस्थित होते.
कायंदे म्हणाले, मायबोली सारख्या अपंग शाळांची संख्या वाढली पाहिजे. ही दिव्यांग शाळा प्रामुख्याने वंचित मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सातत्याने धडपडत असते. विनाअनुदानित असूनही संस्था निवासी मुलांना सकस आहार देऊन सक्षम करीत आहे. त्यामुळेच या मुलांचे आयुष्य उभे राहत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. बबन कडभाने म्हणाले, शाळेतील दिव्यांग मुलांची प्रगती पाहून आणि त्यांना मिळत असलेले व्यावसायिक प्रशिक्षण पाहून समाधान वाटले. मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. सुखदेव आहेर यांनी आभार मानले.
दरम्यान, कर्णबधिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. ऐकता, बोलता न येणाऱ्या चिमुकल्यांचे कलाविष्कार पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त करीत त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.