न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्याची गरज : मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:21 IST2018-07-29T00:20:41+5:302018-07-29T00:21:07+5:30
न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले.

न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविण्याची गरज : मोरे
नाशिकरोड : न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा तिसरा खांब असून, त्याशिवाय लोकशाही जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावर स्वमालकीच्या तीन एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या नाशिकरोड न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन कोनशिला अनावरण शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सिन्नरफाटा येथील स्वागत लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना न्यायमूर्ती रणजित मोरे म्हणाले की, १९५३ साली नाशिकरोड न्यायालयाची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत भाडे तत्त्वाच्या जागेतच न्यायालय सुरू होते. सद्यस्थितीत सुरू असलेल्या नाशिकरोड न्यायालयाची जागा ही अत्यंत अपुरी पडत असल्याने वकील, पक्षकार आदी सर्वांचीच गैरसोय होत आहे.