नाशिक : वणी येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून खासगी मारुती इर्टिगा कारने मुंबईकडे परतत असताना वाडीवऱ्हे जवळ मुंबई-नाशिकमहामार्गावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात कारची समोरील बाजु चक्काचूर झाली. या अपघातात मुंब्रा पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक पांडुरंग चिंतामण खांडवी यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. तसेच त्यांच्या पत्नीसह मुलगा, मुलगी आणि कारचालक जखमी झालाआहे. जखमींवर शहरातील मुंबईनाका भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यावेळी घटनेची माहिती मिळताच घोटी महामार्ग पोलीसांसह वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. अपघातात मिना पांडुरंग खाडवी (४०), वैष्णवी पांडुरंग खांडवी (१५), जय पांडुरंग खांडवी (१२, सर्व. रा. कादरी मेन्शन, क्वार्टर, माहिम पोलीस वसाहत, मुंबई) आणि कारचालक विनायक रघुनाथ सानप (२०,रा.मुंब्रा) हे जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने या चौघांचे प्राण वाचले. मुंब्रा पोलीस ठाण्यातील प्रशासन विभाागात पोलीस निरिक्षक म्हणून खांडवी मागील चार ते पाच वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते मुळचे सुरगाणा येथील रहिवासी असून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मुंब्रा पोलीस दलात शोककळा पसरली असून उपायुक्त ए.एम.अंबुरे, सहायक आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी दु:ख व्यक्त केले आहे. --